श्रीगोंदा : चार-पाच वेळा विधानसभा लढविली. परंतु यश आले नाही. या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडी होवो अथवा ना होवो पण एकास एक उमेदवार देण्यासाठी नागवडे परिवार निवडणूक लढविणार नसल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांनी ढोकराई येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना सांगितले.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी श्रीगोंद्यातील आघाडी नेत्यांची वज्रमूठ बांधून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी करण्याचे आदेश दिले आहेत़ मतविभागणी टाळण्यासाठी पवारांच्या शब्दाला मान देण्याचा निर्णय नागवडेंनी घेतला अन् आघाडीतील कार्यकर्त्यांचा श्वास मोकळा झाला.नागवडे म्हणाले की, विधानसभेची निवडणूक २३ दिवसावर आली आहे. ग्रामपंचायत, सोसायटी, नगरपालिका निवडणुकीत अल्प कालावधीत प्रचार यंत्रणा राबविताना बेजार होतो. मी कार्यकर्त्यांच्या भावना, प्रतिसाद समजू शकतो. परंतु भविष्यात काही तरी मिळवायचे असेल काही कटू निर्णय घ्यावे लागतात. आमदारकी म्हणजे सर्व काही नाही. समाज सेवेचे अनेक मार्ग आहेत. मोहिते पाटील, प्रसादराव तनपुरे व शंकरराव कोल्हे हे हत्तीचे बळ असणारे नेते आमदार नाहीत. मात्र माणसं संपली नाही. राज्याच्या राजकारणात तेवढाच दरारा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराज होवू नये़ सत्ता नसली तरी मी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे.जि. प. चे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार म्हणाले की, तालुक्याचा कारभारी कपडे बदलल्या सारखा पक्ष बदलतो. ते रात्रीत भाजपात गेले. आता सावध भूमिका घ्यावी लागणार आहे. सर्वजण एकत्र राहिले तर मतदारसंघात सत्ता परिवर्तनाचे स्वप्न साकार होईल.यावेळी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अनुराधा नागवडे, अनिल वीर, बाळासाहेब गिरमकर, धनसिंग भोयटे, मंगला कौठाळे, उमा काटे, दिलीप गायकवाड, वसंत उंडे, रोहिदास पवार, माऊली रासकर, संतोष रोडे, बाळासाहेब कुरूमकर, जयश्री शेलार यांची भाषणे झाली.
निवडणूक रिंगणातून नागवडेंची माघार
By admin | Published: September 23, 2014 1:09 AM