अहमदनगर : गेल्या अनेक महिन्यांपासून पथदिवे बंद असल्यामुळे शहरामध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले असून, महापालिकेने पथदिवे दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे,अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल , असा इशारा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शहरासह महामार्गावरील पथदिवे बंद असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच कॉलनी अंतर्गत भागातील पथदिवे बंद असल्याने चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. मनपाच्या माध्यमातून शहरातील पथदिव्यांची देखभाल व दुरुस्तीसाठीची निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र, ती निविदा प्रक्रिया न्यायप्रविष्ठ झाल्यामुळे शहरातील जनतेला किती दिवस अंधारात रहावे लागेल, हे सांगता येणार नाही. त्यासाठी न्यायालयामध्ये महापालिकेने सक्षमपणे बाजू मांडून निविदाप्रक्रियेला चालना द्यावी. तोपर्यंत महापालिकेने स्वतः बंद असलेले पथदिवे दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अन्यथा आंदोलन केले जाईल, असे कोतकर यांनी म्हटले आहे.