अफवांकडे दुर्लक्ष करा, लोकसभेची नगरची जागा राष्ट्रवादी सोडणार नाही : अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 02:26 PM2018-02-15T14:26:16+5:302018-02-15T15:00:14+5:30
नगर जिल्ह्याच्या राजकारणात अफवांचे पिक सुरू झाले आहे. पण काहीही झाले तरी नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही आणि श्रीगोंद्यात आमदार राहूल जगताप हेच उमेदवार राहतील, असा ठाम विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
श्रीगोंदा : नगर जिल्ह्याच्या राजकारणात अफवांचे पिक सुरू झाले आहे. पण काहीही झाले तरी नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही आणि श्रीगोंद्यात आमदार राहूल जगताप हेच उमेदवार राहतील, असा ठाम विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
श्रीगोंदा येथे हल्लाबोल आंदोलनाप्रसंगी संत शेख महमंद महाराज मंदीर मैदानात आयोजित सभेत पवार बोलत होते़ अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते.
पवार म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही बारामतीची जागा गेली तरी चालेल पण श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादीकडे कशी राहील यासाठी युव्हरचना आखली होती. शिवाजीराव नागवडे, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा, तुकाराम दरेकर यांनी सहकार्य केले. आता राहूल जगताप हेच पुढील विधानसभेचे उमेदवार असतील. आम्ही ज्यांना पालकमंत्री व प्रदेशाध्यक्ष केले, ते तिकडे गेले. त्यांची सध्या काय अवस्था झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप, संग्राम जगताप, वैभव पिचड यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरले. त्यांना निलंबित केले. सरकारने ३४ लाख कोटीची ८९ लाख शेतक-यांना कर्जमाफी केल्याची घोषणा केली आहे. पण प्रत्यक्षात कुणाच्या खात्यावर पैसे जमा झाले. मग परराज्यातील शेतक-यांना कर्जमाफी केली, का असा सवाल पवार यांनी केला.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. सुप्रिया सुळे, आ. राहूल जगताप, तुकाराम दरेकर यांची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ. संग्राम जगताप, चित्रा वाघ, चंद्रशेखर घुले, दादाभाऊ कळमकर, भगवानराव पाचपुते आदी उपस्थित होते.