नेत्यांनी केवळ सोयऱ्या धायऱ्यांचा पक्ष जपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:19 AM2021-03-07T04:19:58+5:302021-03-07T04:19:58+5:30
बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड शनिवारी नगर येथे पार पडली. यात अध्यक्षपदाची माळ राष्ट्रवादीचे नेते उदय शेळके यांच्या गळ्यात ...
बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड शनिवारी नगर येथे पार पडली. यात अध्यक्षपदाची माळ राष्ट्रवादीचे नेते उदय शेळके यांच्या गळ्यात पडली. उपाध्यक्षपदी संगमनेर येथील ज्येष्ठ नेते माधवराव कानवडे यांना संधी देण्यात आली. निवडीवेळी जिल्हा बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते. त्यात काही भाजप नेत्यांचाही समावेश होता. गेली दोन दिवस अध्यक्षपदाच्या शर्यतीत भानुदास मुरकुटे व उदय शेळके या दोघांचे नाव आघाडीवर होते. या दोघांपैकी एकाची अध्यक्षपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता होती. यात शेळके यांनी बाजी मारली. शनिवारी सायंकाळी उशिरा मुरकुटे यांनी ‘लोकमत’कडे निवडीवर प्रतिक्रिया दिली.
मुरकुटे म्हणाले, जिल्हा बँकेची निवडणूक ही पक्षीय पातळीवर लढविण्यात आली नव्हती. शेतकरी विकास आघाडीच्या नावे ती लढवली गेली. पक्षीय जोडे बाजूला ठेवण्यात आले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे नेते त्यासाठी एकत्र आले होते. सामोपचाराने व बिनविरोधपणे निवडणूक पार पाडण्याचा प्रयत्न होता. मात्र, अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीला सोयरे धायरे पक्षाचेच जोडे घालण्यात आले. महाविकास आघाडीतील तसेच भाजपातील जिल्ह्यातील प्रमुख नेते एकत्र आल्याचे या निवडीत पाहायला मिळाले. या सर्वांनीच नात्यागोत्याचे राजकारण पुढे केले. त्यातूनच अध्यक्षपदी शेळके व उपाध्यक्षपदी कानवडे यांची निवड झाली.
..............
निवड मान्य नाही
ही निवड आपल्याला मान्य नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आपण लवकरच भेट घेणार आहोत. या निवडीला त्यांच्याकडे विरोध दर्शविणार असल्याचेही मुरकुटे यांनी स्पष्ट केले. बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर मुरकुटे यांनी थेट बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्याने त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. यापूर्वी भाजपा नेते शिवाजी कर्डिले यांनीही बँकेच्या राजकारणावर टीका केली होती.