करंजीतून अपहरण केलेल्या तरुणाची बारा तासांत सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:23 AM2021-07-27T04:23:09+5:302021-07-27T04:23:09+5:30
करंजी : करंजी येथील बसस्थानकावरून दगडवाडी (ता. पाथर्डी) येथील शहादेव उमाप याचे अपहरण झाले होते. पाथर्डी पोलिसांनी घटनेने गांभीर्य ...
करंजी : करंजी येथील बसस्थानकावरून दगडवाडी (ता. पाथर्डी) येथील शहादेव उमाप याचे अपहरण झाले होते. पाथर्डी पोलिसांनी घटनेने गांभीर्य ओळखून अवघ्या १२ तासांत शहादेव याची सुटका केली.
करंजीपासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या दगडवाडी येथील अरूण शांतीलाल उमाप (५१) यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनला मुलाचे अपहरण झाल्याची फिर्याद २४ जुलैला दिली होती. अरूण उमाप यांचा मुलगा सागर उमाप याने ऊस तोडणीसाठी शिवाजी विष्णू वाघमारे( रा. माळेगाव, ता. शिरूर, जि. बीड) यांच्याकडून १५ हजार रुपये घेतले होते. सागर याने पैसे परत केले नाहीत म्हणून अरूण उमाप यांचा दुसरा मुलगा शहादेव याचे करंजी (ता. पाथर्डी ) येथून अपहरण केले. गांभीर्य ओळखून पाथर्डी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. चार पथके तयार करून तांत्रिक माहितीच्या आधारे अपहरण केलेल्या तरुणास रात्रभर जागून सांदलगाव, पारगाव, ता. दौंड, जि. पुणे येथून शोधून ताब्यात घेतले. यावेळी शिवाजी विष्णू वाघमारे रा. माळेगाव, ता. शिरूर, जि. बीड याला तत्काळ अटक केली.