कुकडीच्या पाण्यात नगरकर उपाशी!
By admin | Published: June 29, 2014 11:20 PM2014-06-29T23:20:01+5:302014-06-30T00:33:50+5:30
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील सर्व धरणातील पाणी साठा जिल्हाधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे.
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील सर्व धरणातील पाणी साठा जिल्हाधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. मात्र पुणे जिल्ह्यासाठी डिंबे धरणाच्या उजव्या कालव्यातून अखंडपणे आवर्तन चालू आहे. मात्र नगर जिल्ह्याचा कालवा मात्र कोरडा ठेवण्यात आला आहे. पाणी वाटपात पुणेकर तुपाशी तर नगर जिल्हा मात्र उपाशी आहे. कुकडी प्रकल्पातील नगर व सोलापूर जिल्ह्यातील सुमारे २५० गावांमध्ये अस्मानी जलसंकट उभे राहिले आहे. श्रीगोंदा, करमाळा, कर्जत, पारनेरच्या लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन कुकडीच्या आवर्तनाची मागणी केली. विरोधकांनी पाणी प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा झटका दाखविला. श्रीगोंद्यात पिण्याच्या आवर्तनासाठी सर्वपक्षीय बैठक घेतली. कुकडीचे पिण्यासाठी आवर्तन सोडण्याबाबत दि.१ जुलै रोजी मुंबईत कालवा सल्लागार समितीची बैठक होत आहे. पिण्यासाठी पाणी राखीव असताना डिंबे उजवा कालवा कुणाच्या आदेशावरून सोडण्यात आला. येडगाव कालव्यातून पाणी सोडण्यासाठी बैठक कशासाठी यावर आ. बबनराव पाचपुते, आ. विजय औटी, आ. प्रा.राम शिंदे, आ. शामल बागल यांनी प्रहार करण्याची गरज आहे. कुकडी पाणी प्रश्न कायमस्वरुपी निकालात काढण्यासाठी डिंबे-माणिकडोह बोगदा तातडीने करणे गरजेचे आहे तरच नगरकरांना अच्छे दिन येतील अन्यथा शेतीचे वाळवंट होणार हे निश्चित आहे. (तालुका प्रतिनिधी)
कुकडीचे जलसंकट...
गेल्या वर्षी कुकडी प्रकल्पातील धरणामध्ये ३१.५ टीएमसी (१०० टक्के) उपयुक्त पाणी साठा आला. मात्र पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांवर दबाव आणून सुमारे ५-६ टीएमसी पाण्यावर डल्ला मारला. त्यामुळे नगर, सोलापूर जिल्ह्यावर एका आवर्तनाचा अन्याय झाला ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री चौकशी करणार का? नगरकर तहान भागविण्यासाठी पिण्याचे आवर्तनासाठी व्याकूळ झाले आहेत. मात्र पुणे जिल्ह्यात डिंबेचा उजवा कालवा व घोड नदीत सुमारे २५० क्युसेकने पाणी कसे सोडले यावर मुख्यमंत्री चौकशी करणार का? हाच खरा सवाल आहे. मलमपट्टी आणि आॅपरेशन कुकडीच्या पाण्यासाठी सर्वच पक्षातील नेते मंडळी उन्हाळ्यात टाहो फोडतात. लोकप्रतिनिधी बैठकाच्या तारखा सांगतात तर विरोधक आंदोलन पेटवितात. आवर्तनावर मलमपट्टी केली जाते. मात्र पाणी प्रश्नाचा आजार तसाच ठेवला जातो. कुकडीचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले. आम्ही दोन दिवसापूर्वी डिंबे धरणावर गेलो असता डिंबेचा उजवा कालव्यात २०० क्युसेकने तर घोड नदीत १०० क्युसेसने पाणी सोडले होते हे डोळ्यांनी पाहिले. यामुळे मनात दु:खाचे काहूर निर्माण झाले. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिण्यास पाणी नाही. मात्र पुणे जिल्ह्याला शेतीस पाणी हा कुठला न्याय! शेतकऱ्यांनी आघाडी सरकारमधील मंत्री, आमदारांना जाब विचारण्याची गरज आहे. अन्यथा नगर जिल्ह्यातील शेतीचे वाळवंट झाले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे दुर्दैवी सत्र चालू होईल, याला जबाबदार कोण? -राजेंद्र म्हस्के अध्यक्ष, कुकडी घोड पाटपाणी, कृती समिती