बिले थकल्याने कंत्राटदारांचा आत्महत्येचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:20 AM2021-01-21T04:20:21+5:302021-01-21T04:20:21+5:30
अहमदनगर : गेल्या पाच वर्षांपासून गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्याबाबत केलेल्या कामाची (२५१५) बिले थकली असून, ती तातडीने अदा करावीत, ...
अहमदनगर : गेल्या पाच वर्षांपासून गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्याबाबत केलेल्या कामाची (२५१५) बिले थकली असून, ती तातडीने अदा करावीत, अन्यथा कंत्राटदारांवर आत्महत्येची वेळ येईल, असा इशारा राज्य कंत्राटदार महासंघाच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागात दिलेल्या निवेदनात दिला आहे.
रोजगार हमी योजनेच्या (कार्य) कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, जिल्ह्यात २०१५ ते २०२० या वर्षांत २५१५ची अनेक कामे झाली. या कामांसाठी नियुक्त कंत्राटदारांनी बँकांचे कर्ज काढून या योजनेतील कामे पूर्ण केली. ही सर्व कामे पूर्ण होऊन एक ते दोन वर्षे झाली तरी या कामाचे पैसे शासनाकडून मिळालेले नाहीत. गेल्या ५ वर्षांत सुमारे ३४ कोटी रुपयांची थकीत बिलाची रक्कम असून, ती तातडीने अदा करावी. अनेक कंत्राटदार बिले मिळत नसल्याने मानसिक तणावाखाली आहेत. त्वरित ही बिले अदा केली नाही, तर कंत्राटदार आत्महत्या करतील, त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या विभागाची असेल, असा इशारा राज्य कंत्राटदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष इंजि. समीर शेख, उपाध्यक्ष हर्षद भोर्डे, सचिव मिलिंद बोंगाने, खजिनदार अक्षय कराड, संघटक हृषीकेश ढाकणे, शहराध्यक्ष वैष्णव मिसाळ आदींनी दिला आहे.