अहमदनगर : नगर तालुक्यातील अकोळनेर येथे उदयोन्मुख धावपटू सौरभ जाधव येत्या प्रजासत्ताकदिनी हाती तिरंगा ध्वज घेऊन ७२ किलोमीटर अंतर धावण्याचा विक्रम करणार आहे. कोठेही न थांबता ९ तासात ७२ किमी अंतर पार करण्याचा त्याचा मानस आहे. पुणे येथे ही स्पर्धा होत आहे.
सौरभ जाधव हा मूळचा अकोळनेर येथील असून अकोळनेरचे माजी सरपंच अरुण जाधव यांचा पुतण्या आहे. सौरभचे वडील पोपट जाधव यांना सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची होती. मात्र त्यांचे ते स्वप्न अधुरे राहिले. पोपट जाधव यांचे कुटुंब सध्या कामानिमित्त हडपसर (पुणे) येथे स्थायिक आहे. लहानपणापासूनच सौरभला खेळाची आवड होती. तो सध्या एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथे कला शाखेच्या तृतीय वर्षात शिकत आहे. आंतरराष्ट्रीय धावपटू महेंद्र बाजारे हे त्याचे प्रमुख मार्गदर्शक, तर संदीप टेळेकर, निलेश मिसाळ, अमृता पंडित, शेरसिंह यांचे देखील त्यास मार्गदर्शन मिळत आहे.
या स्पर्धेचे आयोजन इंडियन फ्लॅग रनर्स या संस्थेचे सुदर्शन सिंग व तेजेंद्र सिंग यांनी केले आहे. प्रजासत्ताक दिनी हातात तिरंगा घेऊन ७२ किलोमीटर अंतर १४ तासापेक्षा कमी वेळेत पूर्ण केल्यास इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याच्या नावाची नोंद होणार आहे. येत्या २६ जानेवारी रोजी सौरभ मगरपट्टा (पुणे) येथून धावणार आहे. भारतातून ६३ धावपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
हा विक्रम प्रस्थापित करताना सांगलीची प्रणाली जाधव ही धावपटूही त्याच्या मदतीला असणार आहे. १२ किमी, ३२ किमी, हाफ मॅरेथॉन अशा अनेक स्पर्धांमधून तो आजवर धावला आहे. भारतीय सैन्यात भरती होण्याचे वडिलांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करणार असल्याचा सौरभचा मानस आहे.
-------
फोटो - १९सौरभ जाधव