अहमदनगर : जिल्ह्यात पाच जागा जिंकत भाजपाने घवघवीत यश मिळविले आहे. श्रीगोंद्यात माजी मंत्री बबनराव पाचपुते, नगर शहरात अनिल राठोड,नेवाशात शंकरराव गडाख, शेवगाव-पाथर्डीत चंद्रशेखर घुले यांना पराभवाचा धक्का बसला. मात्र शिर्डीत राधाकृष्ण विखे आणि संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात या काँग्रेसच्या माजी मंत्र्यांनी मोठय़ा मताधिक्यासह एकतर्फी विजय साकारले.
राहुरीतून शिवाजी कर्डिले, जामखेडमध्ये राम शिंदे, कोपरगावात स्नेहलता कोल्हे, शेवगाव-पाथर्डीत मोनिका राजळे आणि नेवाशातून बाळासाहेब मुरकुटे भाजपाकडून विधानसभेत पोहचले आहेत. २00९ च्या विधानसभेत तीन आमदार असलेल्या सेनेने दोन जागा गमावल्या. पक्षाची ताकद आता पारनेरमधील विजय औटी यांच्या विजयासह केवळ एका जागेपुरती र्मयादित झाली आहे. चार आमदारांसह आजवर जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला तरुण उमेदवारांनी सावरले. मातब्बरांच्या पराभवानंतरही पक्षाने तीन जागा पटकावल्या आहे. नगर शहरातून संग्राम जगताप, श्रीगोंद्यात राहुल जगताप आणि अकोलेतून वैभव पिचड विजयी झाले आहेत. काँग्रेसने मात्र तीन जागा टिकविण्यात यश मिळविले आहे. शिर्डीतून काँग्रेसचे राधाकृष्ण विखे यांचा विजय सर्वात मोठा ठरला तर नगर शहरात राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांचा ३३१७ मतांनी झालेला विजय सर्वात निसटता विजय ठरला. श्रीरामपूरची जागा काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळेंनी राखली आहे.
शनिशिंगणापूर येथे दगडफेक
निकालानंतर शनिशिंगणापूर येथे दगडफेकीचा प्रकार घडला. काही कार्यकर्ते गावातील दुकाने बंद करण्यासाठी सरसावले होते. याच गोंधळात दगडफेकीचा प्रकार उद्भवला. काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांच्या ताफ्यावरही जमावाने दगडफेक केली. यात सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल बेहराणी व चालक जखमी झाले आहेत. याप्रकरणी सोनई पोलिसात गणेश भुतकर व अविनाश बानकर यांच्यासह दहा-पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.