अहमदनगर : नगर शहरात गुंडगिरी कोणाची आहे, हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे. नगर शहर हा सेनेचा बालेकिल्ला असल्यानेच आम्हाला बाहेरून कोणी आणण्याची गरज नाही. गुंडागर्दी ही सेनेची संस्कृती नसल्याचे स्पष्टीकरण माजी आमदार अनिल राठोड यांनी येथे पत्रकार परिषदेत दिले. संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहरप्रमुख संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, अनिल शिंदे यावेळी उपस्थित होते. कोरेगावकर म्हणाले, ही राजकीय निवडणूक नव्हती. निधनामुळे आकस्मिक झालेली निवडणूक होती.पतीच्या निधनानंतर प्रतिभा भांगरे यांना सन्मान मिळावा, कुटुंब सांभाळण्यासाठी त्यांना ऊर्जा मिळावी, यासाठी सेनेने भांगरे यांना उमेदवारी दिली होती. विरोधक निवडणूक बिनविरोध करतील, असे वाटले होते, पण तसे झाले नाही. राठोड म्हणाले, पंचवीस वर्षे सेनेची सत्ता होती, विजय हा नेहमीचा आहे. उत्साहात सेनेने कधी आतातायीपणा केला नाही. गुंडगिरी, दादागिरी संपवून संरक्षण व विकास हे सेनेचे व्हिजन आहे. सेना-भाजप स्वतंत्रपणे लढल्यामुळे विधानसभेत पराभव झाला. कोठी रस्ता व बालिकाश्रम रस्ता हे विकासाचे व्हिजन असल्याचे उदाहरण आहे. अगोदर फेज टू पाणी योजना पूर्ण करा. नंतर चाळीस कोटी रुपयांतून रस्ते कॉँक्रिटीकरण करा, त्यामुळेच हा निधी थांबविला असल्याचे राठोड म्हणाले. सेनेचा कार्यकर्ता, पदाधिकारी यांनी एकदिलाने काम केल्याने हा विजय झाल्याचे ते म्हणाले. मतदानाच्या अगोदरच्या रात्री आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भांगरे यांच्या घरासमोर जमाव जमवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तशी तक्रारही भांगरे यांनी पोलिसांत दिलेली आहे. पोलिसांनी मात्र अदखलपात्र गुन्हा नोंदविला. कोणावर अन्याय करू नका, अन्याय सहन करू नका, ही सेनेची शिकवण असल्याचे कोरगावकर यांनी सांगितले. मनपातील सत्तेचा गैरवापर करून युतीला मानणारे सहाशे मतदार वगळले तर आघाडीला मानणारे दीड हजार मतदार वाढविले, असे सांगत याबाबत तक्रार करणार असल्याचे शशिकांत गाडे यांनी सांगितले. प्रभाग ११ च्या निवडणुकीतही असाच प्रकार घडल्याचे गाडे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
गुंडगिरी कोणाची, हे जनतेला ठाऊक
By admin | Updated: April 19, 2016 00:15 IST