अहमदनगर शहरामध्ये गत सहा दिवसांपासून लसीकरण बंद आहे. महापालिकेकडून रोज सायंकाळी लसीकरणाबाबतचा महापौर-आयुक्तांचा संदेश येतो. ‘आज लस मिळणार नाही’, असाच तो संदेश असतो. गेल्या सहा दिवसांपासून एकही लस मिळालेली नाही. नागरिकही लसीकरण केंद्रावर रोज जाऊन चौकशी करीत असतात. नागरिकांच्या या समस्येला नगर शहरातील एका संघटनेने बुधवारी वाचा फोडली. लस मिळत नसल्याने त्यांनी प्रशासनाचा निषेध केला. महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर त्यांनीही निषेधाचा फलक लावला. त्यानंतर काही वेळातच महापालिकेचा एक संदेश व्हायरल झाला. त्यात लिहिले होते, ‘महापालिकेच्या पुढील आरोग्य केंद्रावर रेबिजची लस उपलब्ध करण्यात आलेली आहे. या संदेशाने मात्र अनेकांचा हिरमोड झाला. जी लस पाहिजे, ती लस काही मिळत नाही आणि जी पाहिजे नाही, त्या लसीबाबतचा हा संदेश पाहून अनेकांचा संताप अनावर झाला. काहींनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करीत ही लस आधी कोणाला द्यावी? अधिकाऱ्यांना की पदाधिकाऱ्यांना? असा सवाल करताच चांगलाच हशा पिकला. आपल्या आंदोलनाचा असा इफेक्ट होईल, हे पाहून आंदोलकांनाही हसावे की रडावे ते कळेनासे झाले.
कुजबूज- १
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST