गावातील मध्यवर्ती ठिकाणी मंदिराजवळ असलेले पिंपळाचे झाड शंभर वर्षे जुने होते. झाडाखाली दगडी पारावर बसून गावगाडा चालत असे. बैल पोळा, वीराचा पाडवा, गावची जत्रा-यात्रा पिंपळ वृक्षाच्या साक्षीने साजरे होत. पिंपळ वृक्ष व पार नामशेष करून सभामंडप उभारण्यात येत आहे. सभामंडप होण्यास विरोध नाही मात्र जागेची निवड चुकीची आहे आणि पिंपळ वृक्ष तोडायला नको होता. याबाबत दाद मागणार असल्याचे नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी असणारे चाकरमानी गावकरी डाॅ. शरद तळपाडे, मधुकर तळपाडे, बहीरू कोंदे, बुधा तळपाडे, जालिंदर तळपाडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
गावातील चार-सहा लोकांच्या आर्थिक हितासाठी हा सभामंडप बांधण्यात येत असल्याचा दावा डाॅ. शरद तळपाडे यांनी केला असून, पिंपळ वृक्ष व पार तोडण्याच्या कृती विरोधात गावकऱ्यांच्या सह्यांची मोहीम राबवून तीव्र विरोध करणार असल्याचे सांगितले.
सभामंडपाच्या जागेला अडसर ठरणारे झाड गावकरी यांच्या संमतीने तोडण्यात आले आहे. सभामंडप प्रस्ताव दाखल करताना जागेचा उतारा, ग्रामसभा व ग्रामपंचायतीचा ठराव सादर केलेला आहे. पिंपळ वृक्ष तोडला गेला तेव्हा मी कामानिमित्त बाहेरगावी होतो, असे ग्रामसेवक सोमनाथ साबळे यांनी सांगितले. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी सरपंच यांचा संपर्क होऊ शकला नाही.