नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट परिसरात ३० नोव्हेंबर रोजी दोन मारेकऱ्यांनी गळा चिरून यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा जरे यांची हत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी तीन दिवसांत ज्ञानेश्वर शिंदे, फिरोज शेख या मारेकऱ्यांसह आदित्य चोळके, सागर भिंगारदिवे व ऋषीकेश ऊर्फ टप्या वसंत पवार या पाच आरोपींना जेरबंद केले. या हत्येची बोठे याने सागर भिंगारदिवे याच्यामार्फत सुपारी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले. पोलिसांनी जेरबंद करण्याआधीच बोठे नगर शहरातून पसार झाला. गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस बोठे याचा शोध घेत आहेत. त्याच्या शोधार्थ पोलिसांनी अर्धा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्याच्या विरोधात स्टॅडिंग वॉरंट काढून देशभरातील पोलिसांना बोठेला जेरबंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, तरीही तो सापडेना. फरार असतानाही बोठे वकिलांच्या संपर्कात राहून जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने औरंगाबाद खंडपीठात अर्ज केला आहे. पोलिसांची दमछाक करणारा बोठे लपलाय तरी कोठे, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकही विचारू लागले आहेत.
..................
पोलिसांना नडला अतिआत्मविश्वास
जरे यांची हत्या झाल्यानंतर बोठे याची संशयास्पद हालचाल सुरू झाली होती. ही बाब पोलिसांच्याही निदर्शनास आली होती. त्याचवेळी बोठे याच्यावर नजर ठेवली असती तर आता पोलिसांना एवढी धावपळ करण्याची वेळ आली नसती. आरोपी पळून पळून कुठे पळणार, हा अतिआत्मविश्वासच पोलिसांना या प्रकरणात नडला, असेच म्हणता येईल. रेखा जरे यांच्या हत्याकांडाला दोन महिने पूर्ण झाले तरी गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे मात्र अद्यापपर्यंत पोलिसांना सापडलेला नाही.