मुंबई येथील बंदरात आयुष्यभर हमाली केल्यानंतर सूर्यभान भाऊसाहेब गवारे यांनी श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव गलांडे येथे साडेसहा एकर शेती घेतली़ सेवानिवृत्तीनंतर ते या शेतीत रमले़ या शेतीत एप्रिल महिन्यात गवारे यांनी अर्धा एकर वांग्याची लागवड केली़ ३० गुंठे क्षेत्रात अवघ्या तीन महिन्यात गवारे यांनी तब्बल दोन लाखाचे उत्पन्न मिळविण्याची किमया साधली़सूर्यभान गवारे यांचे मूळ गाव पारनेर तालुक्यातील अस्तगाव़ पण सततच्या दुष्काळी परिस्थितीला कंटाळून कुकडीच्या पाण्याचा अंदाज घेत गवारे यांनी श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव गलांडे येथे साडेसहा एकर शेती दहा वर्षापूर्वी खरेदी केली़ पण दुष्काळामुळे पाणी प्रश्न गंभीर झाला अन् शेतीचा निर्णय चुकल्याची खंत सतावू लागली़ गवारे यांचा मुलगा संदीप हा पोलीस झाला़ संदीपने आई-वडिलांचा उत्साह वाढविण्यासाठी गेल्या वर्षी ३० गुंठे जागेत शेततळे तयार केले़ या शेततळ्यात पाणी साठविले़ या पाण्यामुळे सूर्यभान यांनी पत्नी रंजना, सून जयश्री यांच्या मदतीने वांग्याचे पीक घेतले़ या शेततळ्याच्या पाण्यावर एक एकर डाळिंब जगविले़तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ दारकुंडे, शेतीतज्ज्ञ रमेश हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली गवारे यांनी ३० गुंठे क्षेत्रात एप्रिल महिन्यात वांग्याची लागवड केली़ ठिबक सिंचनाचा वापर करुन पाणी बचत साधली़ शेणखताचा वापर करुन रासायनिक खतांचा वापर टाळला़ त्यामुळे खतांवरील खर्च कमी झाला़ दोन महिन्यानंतर वांगे निघण्यास सुरुवात झाली़ ३० ते ४० रुपये किलो दराने वांग्याला बाजारभाव मिळाला़ आत्तापर्यंत एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न मिळाले असून, पुढील तोडणीतून दीड लाख उत्पन्न मिळेल, असा त्यांना विश्वास आहे़ दुष्काळामुळे सर्व शेती तोट्यात असतानाच वांगे पिकाने त्यांना तारले़ त्यामुळे गवारे परिवाराचा उत्साह दुणावला आहे़
अर्धा एकर वांग्यातून कमावले दोन लाख
By admin | Updated: June 24, 2016 01:19 IST