अहमदनगर : तालुक्यातील निंबोडी परिसरातील एका विहिरीचे खोदकाम सुरू असताना दोन मजुरांचा दरड कोसळून मातीखाली दबल्याने जागीच मृत्यु झाला. मच्छिंद्र पांडुरंग अवघडे (वय ४५, ) आणि संतोष पांडुरंग हराळ (वय ३६, दोघेही रा. गुंडेगाव, ता. नगर) अशी मयत झालेल्या मजुरांची नावे आहेत.निंबोडी येथील रमेश बारकू कराळे यांच्या विहिरीचे खोदकाम सुरू होते. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास विहिरीची दरड विहिरीत काम करीत असलेल्या मजुरांच्या अंगावर कोसळली. त्यामध्ये दोघेही मातीखाली दबले गेले. ग्रामस्थांनी अथक परिश्रमानंतर दोन्ही मजुरांना विहिरीच्या बाहेर काढले, मात्र त्यावेळी त्यांचा मृत्यु झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर ही वार्ता गावोगावी पसरली. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत भिंगार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली. गेल्या दोन-चार दिवसांपासून हे मजूर विहिरीवर काम करत होते.(प्रतिनिधी)
दरड कोसळून दोन मजूर ठार
By admin | Updated: June 17, 2014 00:35 IST