मिरजगाव : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे सीनाचे आवर्तन शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास बंद करण्यात आले. तसा निर्णय सीना धरण प्रशासनाने घेतला आहे.मिरजगावसह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे रब्बी पिकांना जीवदान मिळाले आहे. रब्बी पिकांसाठी सीना धरणातून मंगळवारपासून उजव्या व डाव्या कालव्याला आवर्तन सोडण्यात आले होते. ‘हेड टू टेल’ पर्यंत पाणी पोहचण्याआधीच बिगर मोसमी पावसाने हजेरी लावल्याने या भागातील आवर्तनाचा प्रश्न सुटला. त्यामुळे शनिवारी सकाळी सीना धरणातील सोडलेले आवर्तन थांबविण्यात आले. अकरा नोव्हेंबरपासून शनिवारपर्यंत धरणातील एकूण ११७४.५२ दशलक्ष घनफूट पाण्यापैकी ३२२ क्युसेस पाणी विना वापराचे वाया गेले आहे.गेल्या चोवीस तासात झालेला पाऊस (आकडे मि.मी.मध्ये) मिरजगाव १८, निमगाव गांगर्डा ७२, माहिजळगाव ४८, कोंभळी १२, थेरगाव २०. शनिवारी पहाटे साडेचारपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत पावसाची संततधार सुरु होती. सीना लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस असलातरी नवसरवाडी, मलठण, आनंदवाडी, पाटेगाव, पाटेवाडी या भागात अजुनही पाऊस झालेला नाही. परंतु सीनाच्या आवर्तनामुळे या भागातील पिकांना फायदा झाला असता परंतु आवर्तन बंद झाल्याने या भागातील शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. (वार्ताहर)
सीनाचे आवर्तन बंद
By admin | Updated: November 15, 2014 23:38 IST