राजूर : सोमवारी दि.२० ला दुपारी १२ वा. अकोले-संगमनेर तालुक्यांसाठी निळवंडे धरणातून या वर्षीचे अखेरचे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.भंडारदरा, निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्राबरोबरच पाणलोटातही अद्याप पावसाचे आगमन झाले नाही. त्यातच या दोन्ही धरणांमध्ये मृतसाठा वगळता अर्धा टीएमसीहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. भंडारदरा धरणातून अगोदरच पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून, हे पाणी निळवंडे धरणात साठविण्यात येत आहे. त्यामुळे निळवंडे धरणातून सुरुवातीला १ हजार ६०० क्युसेकने पाणी सोडता येणार आहे. मात्र जसजशी पाणी पातळी कमी होत जाईल तसा पाण्याचा विसर्गही कमी होत जाणार आहे. धरणातून निघणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी होत गेल्यानंतर नदीपात्रातील पाण्याचा वेगही कमी होणार असल्यामुळे संगमनेरपर्यंत पाणी पोहचते की नाही याबाबत शंकाच आहे.भंडारदरा व निळवंडे या धरणांमध्ये मृत साठ्यासह असणारे उपलब्ध पाणी पुढील प्रमाणे- भंडारदरा- ३९७ दलघफू आणि निळवंडे ४७२ दलघफू. २०१५-१६ मध्ये आतापर्यंत भंडारदरा-निळवंडे धरणातून या आवर्तनासह एकूण १३ आवर्तने सोडण्यात आली. (वार्ताहर)मागील वर्षी या दोन्ही धरणांच्या पाणलोटात पावसाचे जोरदार आगमन झाले होते. भंडारदरा धरणात नऊ जूनपासूनच नवीन पाण्याची आवकही सुरू झाली होती. तर २० जूनपासून पाण्याची आवकही चांगलीच वाढली होती. परंतु यंदा मात्र आजपर्यंत पाऊस नसल्याने नवीन पाण्याची आवक झालेली नाही.
आजपासून निळवंडेचे आवर्तन
By admin | Updated: June 19, 2016 23:11 IST