अहमदनगर : ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या अहमदनगर आवृत्तीचा आज ३४ वा वर्धापन दिन. दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त वैशिष्ट्यपूर्ण विशेषांक वाचकांच्या हाती देण्याची ‘लोकमत’ची परंपरा आहे. यावर्षी ‘ज्ञानदीप लावू जगी’ हा संत परंपरेचा समृद्ध वारसा उलगडणारा विशेषांक वाचकांच्या भेटीला येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ‘लोकमत भवन’च्या हिरवळीवर होणारा स्नेहमेळावा कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे. रविवारी सकाळी पालकमंत्री हसन मुश्रिफ हे ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट देणार असून, जिल्हावासीयांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करणार आहेत.
१५ ऑगस्ट २०२१ रोजी ‘लोकमत’ आपला ३४ वा वर्धापन दिन साजरा करून ३५ व्या वर्षात दिमाखाने पदार्पण करीत आहे. आजवर ‘लोकमत’ने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक किंवा जिल्ह्याच्या गुणवैशिष्ट्यांची दखल घेणारे अनेक विशेषांक प्रसिद्ध केले. ‘भूमिपुत्र’, ‘शुरा आम्ही वंदिले’,“वारसा’,
अशा विशेषांकांचा त्यात समावेश आहे. गतवर्षी कोरोनाची महामारी आली. जिल्ह्यात सहा हजार जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर लाखो लोकांचे प्राण वाचविण्यासाठी रात्रंदिवस आपला जीव धोक्यात घालून अनेक व्यक्ती, संस्था, डॉक्टर, रुग्णालयांनी काम केले. अशा कोरोनायोद्ध्यांना सलाम करणारा ‘लढेंगे-जितेंगे’ हा विशेषांक गतवर्षी प्रसिद्ध केला.
याही वर्षी असाच संग्राह्य व दर्जेदार विशेषांक आम्ही वाचकांच्या भेटीला आणला आहे. अहमदनगर ही संतांची भूमी आहे. या भूमीवर नाथसंप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि महानुभव संप्रदायाच्या भरभक्कम पाऊलखुणा उमटलेल्या आहेत. या संप्रदायांनी प्रबोधनाची ज्ञानज्योत पेटवली. हीच परंपरा साईबाबा, अवतार मेहेरबाबा, आनंदऋषीजी महाराज यांच्यापर्यंत पोहोचते. या समृद्ध आध्यात्मिक परंपरेचा आढावा ‘ज्ञानदीप लावू जगी’
या विशेषांकात घेण्यात आला आहे. आजपासून हा विशेषांक काही दिवस वाचकांच्या भेटीला येणार आहे.
दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त ‘लोकमत’ कार्यालयाच्या प्रांगणात स्नेहमेळाव्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो; परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, गर्दी टाळण्यासाठी हा स्नेहमेळावा होणार नाही.