अकोले : अज्ञानापोटी तालुक्यातील डोंगर- टेकड्यांवरील जंगल वणव्यांमुळे जळत असून काळवंडलेल्या वनातील जंगलसंपत्ती व वन्यजीव धोक्यात आले आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ब्राम्हणवाडा-मन्याळे घाटात वणवा पेटला आणि वन जळून खाक झाले. वणव्याची धग शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत येवून पोहोचली. वन विभाग शांत असून कारवाईचा बडगा का उचलला जात नाही? असा सवाल पुढे आला आहे. लाल्या डोंगर, वारंगीचा डोंगर, कोंभाळणे, मुथाळणे घाट, काताळापूर-माळेगाव डोंगर, बाभुळवंडी-खिरविरेचा चोमदेव डोंगर येथील जंगल वणव्याच्या भक्षस्थानी पडले असून गवतकाडी जळून खाक झाली आहे. उंच वाढलेली काही झाडे बचावली आहेत. तर वनातील ससे, मोर व अन्य वन्यजीव दिसेनासे झाले आहेत. लाखो रुपये खर्चून वनविभागाने जाळपट्टे काढले आहेत. यामुळे वनवे कमी होण्यास मदत होत असली तरी ‘वनातील गवत जाळले तर गवताचा चांगला फुटवा होतो’ असा समज ग्रामीण भागात आहे. म्हणून कृत्रिम वनवे पेटत असावे, असा वन विभागाचा अंदाज आहे. आग रात्री लागते मग कारवाई कुणावर करायची, असा प्रश्न नेहमीच असतो. रात्री जंगलांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी सध्या वन कर्मचाऱ्यांचा मुक्काम गच्चीवर किंवा घराच्या छतावरच असल्याचे वन कर्मचारी सांगतात. १५ ते २० जणांची टोळी वन विझवण्यासाठी सध्या सज्ज आहे. वन पेटले की मोबाईलवरुन एकमेकांना कळविले जाते, मग आग विझवण्याची धडपड सुरू होते, असे वन कर्मचारी सांगतात. (तालुका प्रतिनिधी)
मन्याळे घाटात वणवा पेटला
By admin | Updated: May 5, 2016 00:02 IST