लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : दीड वर्षापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. सर्व क्षेत्र या महामारीच्या सावटाखाली आहे. उद्योग, व्यवसाय, व्यापार, रोजगार यांच्यासह सर्वच प्रकारच्या शिक्षण व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षापासून ऑफलाइन शिक्षणाचे धडे बंद झाले आहे. त्यातच शहरात राहण्यासाठी अथवा प्रवास करण्यासाठी कोणत्याच प्रकारची सार्वजनिक वाहतूक पाहिजे त्या प्रमाणात सुरू नाही. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांचा अकरावीचे शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागाकडे ओढा असल्याचे दिसू लागले आहे.
कोरोनामुळे दीड वर्षांपासून सततचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे शहरात राहण्याची, जेवणाची व प्रवासाची मोठी गैरसोय होते आहे. मोठ्या शहरात शिक्षण घेण्याची इच्छा असली तरी सद्य:स्थिती तशी नाही. कारण गेल्यावर्षी शहरात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यांचे अनुभव पाहता यंदा दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्याची विद्यार्थ्यासह पालकांची मानसिकता झाली आहे.
.............
जिल्ह्यात अकरावी प्रवेश देणारी कनिष्ठ महाविद्यालये - ४४०
एकूण जागा - ७६,६००
यंदा दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी - ७०,५६६
अनुदानित तुकड्या - ४५३
विनाअनुदानित तुकड्या - २९५
स्वयंअर्थसहाय तुकड्या - १९२
..............
यंदा माझा दहावीत प्रथम क्रमांक आला आहे. अकरावीत प्रवेशासाठी सीईटी परीक्षा ठेवण्यात आली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर माझी मोठ्या शहरातील महाविद्यालयात प्रवेश न घेता कोपरगाव येथे प्रवेश घेण्याची इच्छा आहे.
- श्रुती वरकड, विद्यार्थिनी
...........
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालो आहे. कोरोनाची परिस्थिती असल्याने आमची व पालकांची आमच्या गावातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत प्रवेश घेण्याची तयारी झाली आहे.
- यश गोरे व विशाल गोरे, विद्यार्थी
..............