अहमदनगर : ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून : गारपीट संदर्भात फेरपंचनामे करावे, मागणीनुसार तातडीने पाण्याचे टँकर सुरु करावे, या मागण्यांसाठी पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथे तसेच रात्रीचे भारनियमन बंद करावे, या प्रमुख मागणीसाठी नेवासा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ही दोन्ही आंदोलने बुधवारी झाली. नेवाशात अचानक रास्ता रोको नेवासा : रात्रीचे भारनियमन बंद करावे, या प्रमुख मागणीसाठी नेवासा येथे दुपारी साडेबाराच्या सुमारास रणरणत्या उन्हात अचानक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते व व्यापारी, नागरिक सहभागी झाले होते. रात्र जागून काढली रात्रीचे भारनियमन बंद करावे म्हणून ग्रामस्थांनी यापूर्वी ‘महावितरण’ ला निवेदन दिलेले आहे. ग्रामसभेत ठरावही झाला. तरीही ‘महावितरण’ निर्णयावर ठाम राहिले. मंगळवारी रात्री भारनियमन झाल्याने नागरिकांनी रात्र जागून काढली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी श्रीरामपूर रोडवरील खोलेश्वर गणपती चौकात अर्धा तास रास्ता रोको केला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलीस व ‘महावितरण’च्या अधिकार्यांची एकच धांदल उडाली. नागरिकांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप करीत आंदोलनकर्त्यांनी ‘महावितरण’च्या अधिकार्यांचा निषेध केला. नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश शिंदे यांनी ‘महावितरण’ चे सहाय्यक अभियंता मिलिंद चौधरी, अभियंता टाक यांच्याशी चर्चा करुन तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी केली. आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मापारी, जैन श्रावक संघाचे अमृत फिरोदिया, भाजपचे अॅड. संजीव शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कैलास कुंभकर्ण तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते. चिंचपूर येथे अडीच तास आंदोलन पाथर्डी : गारपिटीने नुकसान झालेल्यांचे फेरपंचनामे करावे तसेच निवेदन देऊनही पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू न केल्याचे निषेधार्थ तालुक्यातील चिंचपूर इजदे येथे सकाळी चिंचपूर इजदे व कुत्तरवाडी येथील शेतकर्यांनी सुमारे अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकर्यांनी कृषी अधिकार्यांवर प्रश्नांची सरबत्ती करीत शेतकर्यांनी गारपिटीमुळे खराब झालेला कांदा रस्त्यावर फेकून निषेध केला . शेतकर्यांचा सहभाग चिंचपूर इजदे येथे नगर- बीड रस्त्यावर चिंचपूर इजदे व कुत्तरवाडी येथील सुमारे दोनशे शेतकर्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व आजिनाथ खेडकर व दत्तात्रय खेडकर यांनी केले. यावेळी नवनाथ खेडकर, अजिनाथ नागरगोजे, चंद्रकांत जायभाये, योहान खंडागळे, शिवनाथ पालवे आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते. कृषी अधिकार्यांनी नुकसानीची पाहणी न करता हॉटेलमघ्ये बसून पंचनामे केल्याचा आरोप आजिनाथ खेडकर यांनी केला. दत्तात्रय खेडकर म्हणाले, अधिकार्यांनी मनाला वाटेल तसे पंचनामे केले. ग्रामपंचायतीला विचारलेही नाही. तर टाळे ठोकणार येत्या दोन ते तीन दिवसात न्याय न मिळाल्यास तालुका कृषी कार्यालय व तहसील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही संतप्त आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. (तालुका प्रतिनिधी)
नेवासा,चिंचपूर येथे रास्ता रोको
By admin | Updated: May 29, 2014 00:29 IST