संगमनेर : आपण कधीही कुणाच्या वाटेत काटे टाकले नाही, सर्वांना बरोबर घेऊन विकासकामे केली, परंतु काहींचा संगमनेरच्या विकासाकडे पाहण्याचा हेतू चांगला नाही, असा टोला माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता केला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्यात दत्त मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे, पंचायत समितीचे सभापती रावसाहेब नवले, उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, अनिल देशमुख, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते. माधवराव कानवडे व रमाबाई कानवडे यांच्या हस्ते दत्ताची विधीवत पूजा करण्यात आली. संगमनेरचा विकास व राजकारण नैतिकतेच्या पायावर भक्कमपणे उभे असून सर्वांनी यापुढेही विकास कामात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन थोरात यांनी केले. माधवराव कानवडे यांचेही भाषण झाले. जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविक केले. भाऊसाहेब कुटे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
संगमनेरकडे पाहण्याचा काहींचा हेतू दूषित
By admin | Updated: July 4, 2016 23:45 IST