पालिकेकडे कायम कामगारांव्यतिरिक्त दोनशेहून अधिक कंत्राटी कामगार आहेत. ऑक्टोबर महिन्यापासून अद्यापही त्यांना कामाचे वेतन मिळालेले नाही. यातील दीड महिन्याचे वेतन हे सुधर्मा एजन्सीला द्यावे लागणार आहे. मात्र एजन्सीचे प्रतिनिधी अद्यापही पालिका प्रशासनासमोर हजर झालेले नाहीत. एजन्सीने घनकचरा व्यवस्थापनाच्या ठेक्यातील करारानुसार संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती केलेली नाही. त्यामुळे एजन्सीला देय असलेल्या रकमेतून या पैशांची वजावट केली जाणार आहे. हा घोळ कायम राहिल्याने कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सुटू शकलेला नाही. कर्मचारी युनियनचे नेते जीवन सुरुडे यांनी कामगारांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन सुरू ठेवलेल्या कामाची दखल घेत पालिकेने तातडीने वेतन अदा करावे, अशी मागणी केली आहे.
...............................
नगराध्यक्षांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौदाव्या वित्त आयोगातील निधीतून कामगारांचे वेतन अदा करण्यास परवानगी मागितली आहे. त्याकरिता पत्रव्यवहारही केला आहे. आदिक यांचा त्याकरिता पाठपुरावा सुरू आहे.
---------------
ठेकेदारावर फौजदारी नाहीच
पालिका प्रशासनाने सुधर्मा एजन्सीविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी शहर पोलिसांकडे केली होती. मात्र हा दिवाणी स्वरूपाचा वाद असल्याने गुन्हा दाखल करता येणार नाही, असे मत पोलिसांनी नोंदविले आहे. त्यावर पालिकेने वकिलांकडून अभिप्राय मागविला आहे.
------------
घनकचरा व्यवस्थापनाच्या कामासाठी २५ जानेवारीला निविदा मागविल्या आहेत. ५ फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया पार पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- गणेश शिंदे, मुख्याधिकारी
.........................................