मिरजगाव : सीना नदी उगमस्थानात झालेल्या दमदार पावसाने सीना धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सहा वर्षानंतर धरण साठ टक्के भरले.गेली सहा वर्षे भीषण दुष्काळाचा सामना केल्यानंतर परतीच्या पावसाने यावर्षी शेतकऱ्यांचे समाधान केले आहे. सीना नदी उगमस्थानात झालेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाली आहे.पावसाआधी कुकडीचे आर्वतन कर्जत तालुक्यात सुरू असताना पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या आदेशानुसार भोसे खिंडीतून कुकडीचे पाणी सीना धरणात सोडण्यात आले. या कुकडीच्या आर्वतनातून २२२ दशलक्ष घनफूट पाणी सीना धरणात आल्यामुळेच धरणातील पाणी साठा ६२ टक्क्यांवर गेला. यामुळे रब्बीच्या पिकांना दोन आर्वतने मिळू शकणार आहे.आजही सीना नदीतून पाण्याची आवक सुरूच आहे. उगमस्थानात अजून एक दोन दमदार पाऊस झाल्यास सीना धरण ओव्हरफ्लो होऊ शकते. गेल्या काही वर्षापासून सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने या भागात पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. त्यामुळे चिंतेचे वातावरण होते. (वार्ताहर)
सहा वर्षांनंतर ‘सीना’त पाणी
By admin | Updated: October 9, 2016 01:03 IST