राज्यातील आदिवासी जिल्ह्यामध्ये करोनामुळे आदिवासी जनतेवर मोठे संकट कोसळलेले आहे. त्यात रोजगार बुडाल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यातच आपल्या आदिवासी शेतकऱ्यांवर भात लागवड, नाचणी, वरई यांचे लावणीचे मोठे संकट उभे राहिलेले आहे. भात लागवडीसाठी मजुराची व नांगरणी करण्यासाठी बैलाची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासत आहे. काही ठिकाणी ट्रॅक्टरने लागवडीसाठी चिखल करण्याची पद्धत आहे. त्यामुळे भात व नाचणी, वरई लागवडीसाठी नाइलाजाने सावकरांकडे कर्जासाठी जाण्याची वेळ येत आहे. म्हणून आदिवासी जिल्ह्यात किमान आदिवासी शेतकऱ्यांची भात, नागली, वरई लागवडीचा कार्यक्रम हा रोजगार हमी योजनेत घेण्यात यावा व त्याचप्रमाणे बैलाची व टॅक्टर नांगरणी याचाही रोजगार हमीमध्ये समावेश करून किमान लागवडी खालील शेतीची कामे होतील, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. १५ जूननंतर भात, वरई व नाचणी लागवडीची कामे सुरू होत असतात. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय घ्यावा व ही सर्व कामे रोजगार हमी योजनेत समाविष्ट करावीत म्हणजे आदिवासी शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर होण्यास मदत होईल, असे पत्रात म्हटले आहे.
रोजगार हमी योजनेत समावेश करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:16 IST