अहमदनगर : सीना नदीची पूररेषा सिंचन विभागाने नुकतीच निश्चित केली असून, यामुळे नगर शहराचा मोठा भाग बाधित होतो आहे. त्यामुळे नदीचे फेरसर्वेक्षण करून बदल करावा, अशी मागणी संग्राम जगताप यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे दिली आहे.
आमदार संग्राम जगताप यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शहरातून वाहणाऱ्या सीना नदीची लांबी १४ किमी इतकी आहे. नदीला ५०० वर्षांचा इतिहास आहे. नदीच्या पुरामुळे जीवितहानी झाल्याचे एकही उदाहरण नाही. कारण शहराभाेवतीचा भाग दुष्काळी आहे. त्यात या नदीवर पिंपळगाव माळवी येथे धरण बांधण्यात आले आहे. त्यामुळे पुराचा शहराला धोका नाही. सिंचन विभागाने निश्चित केलेल्या पूररेषेत शहरातील मोठा परिसर येतो. हा भाग बाधित होणार असल्याने इमारतींच्या बांधकामांना परवानगी मिळणार नाही. यापूर्वी या भागात ३० हजारांहून अधिक घरांना परवानगी दिली गेली आहे. या घरांना पुराचा धोका निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे. हा शहरावर एकप्रकारे अन्याय असून, त्याचा शहराच्या विकासावर परिणाम होणार आहे. शहरात संरक्षित ऐतिहासिक वास्तू आहेत. या वास्तूपासून ३०० मीटर अंतरावर बांधकाम करण्यास निर्बंध आहे. अनेक नागरिक व शेतकरी यामुळे अडचणी येणार असून, सीना नदीचे फेरसर्वेक्षण करून बदल करावेत, असे आमदार जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे.
..
सुचना फोटो १८ संग्राम जगताप यांच्या नावाने आहे.