अहमदनगर : पेट्रोल-डिझेल- गॅस दरवाढ व ऑटो रिक्षाच्या इन्शुरन्समध्ये केंद्र सरकारने वाढ केली आहे. या निषेधार्थ अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्यावतीने सोमवारी काळ्या फिती लावून व रिक्षाला काळे झेंडे बांधून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
नगर येथील मार्केटयार्ड परिसरातील हमाल भवन येथे झालेल्या या आंदोलनाला आमदार संग्राम जगताप यांनीही काळी फीत बांधून पाठिंबा दिला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, उपाध्यक्ष दत्ता वामन, प्रमुख सल्लागार विलास कराळे, लतीफ शेख, गणेश आटोळे, नसीर खान, कयूम सय्यद, राजू काळे, रघुनाथ कापरे, सुनील खरपे, नासिर सय्यद, निलेश कांबळे, शाहरुख शेख, गोरख खांदवे, गणेश पवार, निलेश लवांडे, राजू टापरे, निसार शेख आदीसह रिक्षाचालक उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षापासून केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल, गॅस व ऑटो रिक्षाचा इन्शुरन्स व ऑटो रिक्षा परवान्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. पूर्वी ऑटोरिक्षा परवान्याची फी २०० रुपये एवढी होती. ती आज १० हजार रुपये झालेली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये रिक्षाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. ‘ड’ वर्ग महापालिका,नगरपालिका, ग्रामीण भागात रिक्षाचा व्यवसाय अत्यंत कमी प्रमाणात आहे. अशा भागांमध्ये जास्तीत जास्त एक हजार रुपये परवाना फी असावी. ऑटो रिक्षाचा विमा फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. रिक्षाचालकांना विम्याचा कुठलाही फायदा नाही. एक टक्का पण विम्याचे क्लेम होत नाहीत. त्यामुळे रिक्षाचालकांना व्यवसाय करणे परवडत नाही. केंद्र सरकार पेट्रोल व डिझेल, गॅस व इन्शुरन्समध्ये केलेली वाढ मागे घ्यायला तयार नाहीत. याचा निषेध करण्यात आला.
--------------
फोटो- १९ हमाल पंचायत
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ रिक्षाचालकांनी काळ्या फिती बांधून केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी आमदार संग्राम जगताप, अविनाश घुले, विलास कराळे, दत्ता वामन यांच्यासह रिक्षाचालक उपस्थित होते.