अहमदनगर : हागणदारीमुक्तीसाठी शौचालय बांधून त्यांच्या वापरात सातत्य ठेवणाऱ्या ९ तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींना अस्मिता ग्राम पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी पुढील चार वर्षात जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्यदिनी या १६ गावातील पदाधिकारी आणि ग्रामसेवक यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या गावात अस्मिता ग्रामची कोनशिला बसवण्यात आली. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती नंदा वारे, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव गवारे, विश्वनाथ कोरडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव जगताप उपस्थित होते. २०१९ पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प यावेळी सोडण्यात आला. अस्मिता ग्राम पुरस्कार मिळवणाऱ्या ग्रामपंचायतींचा आदर्श अन्य गावांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, संगीतादेवी पाटील, महिला बालकल्याण अधिकारी मनोज ससे आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उज्ज्वला बावके उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प
By admin | Updated: August 17, 2015 00:02 IST