अहमदनगर : नगर - औरंगाबाद महामार्गाच्या दान्ही बाजूंच्या साईडपट्ट्या मुरुम टाकून दुरुस्त करण्यात येत आहेत. त्यामुळे अपघाताला आळा बसण्यास काहीअंशी मदत होणार आहे.
नगर - औरंगाबाद महामार्गावरील टोल वसुलीची मुदत संपली आहे. मुदत संपल्यानंतर विकासकाने महामार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. रस्त्यावर डांबराचा थर टाकण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यातील खड्डे बुजविले गेले आहेत. दुसऱ्या टप्प्यात महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या साईडपट्ट्या मुरुम टाकून भरण्यात आल्या आहेत. औरंगाबाद महामार्गावरील वसंत टेकड ते पोखर्डी, शेंडी, वांबोरी फाटा, टोलनाका, जेऊरपर्यंतच्या साईडपट्ट्या दुरुस्त करण्यात आल्या असून, उर्वरित कामही विकासकाने हाती घेतले आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्यात आल्याने वाहनांचा वेग वाढून या मार्गावर अपघात होत आहेत. अवजड वाहने रस्त्यांच्या खाली उतरून होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही अधिक होते. परंतु, साईडपट्ट्या दुरुस्त करण्यात येत असल्याने वाहने पलटी होण्याचे प्रमाण घटले असल्याचे काहींचे म्हणणे आहे.
पावसाळ्यात नगर - औरंगाबाद महामार्गावर मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनांचे नुकसान होत होते. तसेच अपघातांचे प्रमाणही वाढले होते. परंतु, रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
..
फर्श्यांच्या तुकड्यांचे ढीग
नगर - औरंगाबाद महामार्गावर ग्रेनाईटची दुकाने आहेत. फर्श्या कापून उरलेले तुकडे सर्रास रस्त्यावर टाकले जात आहेत. रस्त्यांच्या बाजूला फर्शीच्या तुकड्यांचे मोठे ढीग पडले असून, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
..
सूचना फोटो: ०७ रोड नावाने आहे.