जामखेड / खर्डा : तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर जामखेड शहरासह तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. शहरात पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. ठिकठिकाणी पाणी साचले होते. हा पाऊस रब्बी हंगामासाठी उपयुक्त आहे. आतापर्यंत तालुक्यात ७१ टक्के पाऊस झाला आहे. तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर तालुक्यात पावसाने सुरुवात केली होती. खर्डा, नान्नज, जातेगाव येथे अतिवृष्टी होऊन परतीच्या पावसाला प्रारंभ सुरुवात झाली. नान्नज व जवळा येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे तेथील नदीला पाणी आले. जलसंधारण कामामुळे नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो झाले. मुंजेवाडी तलावात ६० टक्के पाणी आले आहे. सोताडा (ता. पाटोदा) येथे मंगळवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावात पाणी येत आहे. यापूर्वीच भुतवडा तलाव ७० टक्के भरला आहे. चार वर्षांनंतर तलाव ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावातील पाणीटंचाई संपुष्टात येणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.मंगळवारी सायंकाळी साडे सहा वाजेनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे खर्डा (ता. जामखेड) येथील शिर्डी-हैदराबाद राज्य महामार्गावरील वाहतूक बंद पडली.पावसामुळे पुलावर पाणी आल्यामुळे पुलावरील वाहतूक बंद पडली आहे. परिसरातील नदी नाले मंगळवारी दुधडी भरून वाहत होते. नदी नाल्यांना पाणी आल्यामुळे प्रवासी गाड्यांसह एस. टी. बससह प्रवासी वाहनांना पाणी ओसरेपर्यंत पैलतिरांवर उभे रहावे लागले. कौतुका नदीवरील पूल ऐतिहासिक जुना दगडी आहे. पुलाचे चिरे निखळले आहेत. जुना दगडी पूल दुरूस्तीला आला आहे. पहिल्या पावसातच पूल नादुरुस्त झाला आहे. विद्यार्थी, दूधवाले, शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा पुलावरुन पाणी गेल्यामुळे काही वेळ गावाशी संपर्क तुटला, असे खर्डाच्या वार्ताहराने कळविले आहे. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)
जामखेडमध्ये पाऊस परतला ; खर्ड्यात वाहतूक बंद
By admin | Updated: September 21, 2016 00:27 IST