राहुरी : मुळा धरणाच्या पाणलोट व लाभक्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावल्याने धरणातून रब्बीसाठी सुरू असलेले आवर्तन कमी करण्यात आले आहे. दोन्ही कालव्यांचा विसर्ग घटवण्यात आल्याची माहिती पाटबंधारे खात्याने दिली. बहुतेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पाण्याचा विसर्ग कमी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली़ अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून दोन्ही कालव्यांचे पाणी बंद करायचे की नाही यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केले आहे. पाणी वापर संस्थांशीही चर्चा सुरू आहे़२६ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या २१.२९८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. उजव्या कालव्यातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग शनिवारी पहाटे तीन वाजता १६५२ वरून ११५२ क्युसेकवर कमी करण्यात आल्याची माहिती धरण अभियंता राजेंद्र कांबळे यांनी दिली़ डाव्या कालव्याचा ३२० ने सुरू असलेला विसर्ग २६० क्युसेकवर आणण्यात आला. मुळा धरणाच्या लाभक्षेत्रावर पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे (मिलीमिटरमध्ये) : नगर ३८, मुळानगर ६०, राहुरी ६८, वांबोरी ८०, कुकाणा ७३, अमरापूर १५०, माका ९०, कासार पिंपळगाव १५५, भातकुडगाव ९२, कोतूळ २७,देवळाली प्रवरा २२, ब्राम्हणी ७५, ताहाराबाद ३५, टाकळीमिया ६८़दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे मुळा धरणामध्ये ११० दलघफू नवीन पाण्याची नोंद झाली.पारनेर भागातून काही प्रमाणावर पाणी धरणात येऊन मिळाले़ धरणाच्या फुगवट्याच्या भागात पावसाने हजेरी लावली़ सकाळी पाणलोट व लाभक्षेत्रावर हलक्या सरी बरसल्या. मात्र दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते़ दिवसभर ढगाळ हवामान होते़ त्यामुळे सूर्यदर्शन झाले नाही़मुळा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून आतापर्यंत शेतीसाठी २७०० दलघफू पाण्याचा वापर झाला़ काल पाऊस पडल्याने धरणाच्या पाण्याची बचत होण्यास मदत होणार आहे़ शेतीसाठी सोडण्यात आलेल्या आवर्तनाबाबत पाटबंधारे खात्याचा सर्व्हे सुरू आहे़ पाणी वापर संस्थांशी चर्चा करून पाण्याची गरज किती यासंदर्भात माहिती मागविण्यात आली आहे़ त्यानंतर दोन्ही कालव्यांतून पाणी सुरू अथवा बंद करण्यावर शिक्कामोर्तब होईल. (तालुका प्रतिनिधी)
मुळा कालव्यांचा विसर्ग घटवला
By admin | Updated: November 15, 2014 23:38 IST