पुणतांबा-वाकडी या रस्त्याच्या दुरुस्तीसह डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी वारंवार निवेदन, आंदोलन, उपोषण करून सुद्धा लोकप्रतिनिधींकडून आश्वासन व्यतिरिक्त कोणतीही कार्यवाही होत नाही. लक्ष्मीनारायण मित्रमंडळ, वाकडी रस्त्याचे रहिवासी यांनी रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करत येणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक, राजकीय पक्षाच्या सार्वजनिक कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असून मतदान करणार नाही, असा इशारा देण्यात आला. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कोपरगाव यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून गेल्या पंधरा-वीस वर्षांत या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. बाभळेश्वर, राजुरी, वाकडी, येलमवाडी, कोल्हार येथे जाण्यासाठी अतिशय जवळचा रस्ता असून पुणतांबा व रामपूरवाडी येथील शेतकरी बांधवांच्या जमिनी आहेत. त्यांचा दळणवळणाचा मुख्य रस्ता आहे. शिक्षणासाठी शालेय विद्यार्थी दररोज याच रस्त्याने ये-जा करतात. लोकप्रतिनिधी फक्त आश्वासन देऊन वेळ मारुन नेतात, असा संताप या परिसरातील नागरिकांनी व्यक्त करत रस्त्यावरील साचलेल्या डबक्यात वृक्षारोपण केले.
वृक्षारोपणप्रसंगी नामदेवराव धनवटे, विनोद धनवटे, ज्ञानेश्वर धनवटे, भास्कर घोडेकर, सोपानराव धनवटे, सुधाकर घोडेकर, मनोज घोडेकर, हरीष पेटकर, सोमनाथ पेटकर, सतीश धनवटे, महेश बोर्डे, बाळासाहेब धनवटे, राजेंद्र घोडेकर, मनोज घोडेकर, विक्रम शिंदे, संतोष जोगदंड, संतोष धनवटे, सुनील धनवटे, पुंजा धनवटे, राजेंद्र घोडेकर, गणेश घोडेकर, सुनील घोडेकर, राजेंद्र पेटकर, ताराचंद शेलार, महेश डोके, भारत शेलार, विजय गाडेकर, वाल्मीक घोडेकर यांच्यासह परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते.
............................
मागील वर्षी रस्ता दुरुस्तीकरिता आमरण उपोषणाला बसलो होतो, परंतु गेल्या वर्षभरात त्यांची कोणतीही दखल शासनाने घेतली नाही.
-विनोद धनवटे, नागरिक
...................
या रस्त्याच्या निविदा उघडलेल्या आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत कोणती एजन्सी काम करणार याची माहिती कळेल व लवकरच काम चालू होणार आहे.
- प्रशांत वाकचौरे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कोपरगाव