अहमदनगर : सोलापूर येथे झालेल्या रेल्वे विभागीय सल्लागार समितीच्या बैठकीत हरजितसिंह वधवा यांनी अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वेचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी विभागीय रेल्वे अधिकारी शैलेश गुप्ता यांनी अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरु करण्यासाठी रेल्वेचे मुख्यालय असलेल्या मुंबई येथील मध्य रेल्वे कार्यालयाला ७ एप्रिल २०२१ रोजी प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती दिली. त्यामुळे नगरकरांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.
मंगळवारी ऑनलाईन झालेल्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीला विभागीय रेल्वे अधिकारी शैलेश गुप्ता अध्यक्षस्थानी होते. यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य अधिकारी प्रदीप हिरडे, अहमदनगर येथून सल्लागार समितीचे सदस्य हरजितसिंह वधवा, श्रीरामपूर, लातूर, उस्मानाबाद, दौंड, गुलबर्गा, सोलापूर, पंढरपूर, उस्मानाबाद, कलबुर्गी येथील सदस्य उपस्थित होते. तसेच या बैठकीसाठी अहमदनगर रेल्वेचे वाणिज्य अधिकारी आर. एस. मीना यांच्यासह सदस्य, अधिकारी उपस्थित होते.
अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरु होण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. प्रवाशांची गरज लक्षात घेऊन सदर सेवा सुरु होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे, असे गुप्ता यांनी बैठकीत सांगितले. नवीन तिसरा आणि चौथा प्लॅटफॉर्म जंक्शन करिता तयार करावा, ज्यामुळे रेल्वे क्रॉसिंगच्या वेळेस अहमदनगर रेल्वे स्थानकावर थांबा मिळेल. अन्यथा त्यांना निंबळक अथवा काष्टी येथे थांबा मिळतो. प्लॅटफॉर्मवर नवीन स्वयंचलित शिडी कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आल्याचे वधवा यांनी सांगितले.
-------
पॅसेंजर गाड्यांची सुरू कराव्यात
पुणे-लखनौ, पुणे-गोरखपूर या गाड्यांना अहमदनगर येथे थांबा द्यावा, अहमदनगर स्थानकावर १०० फूट उंच उभारलेल्या पोलवर राष्ट्रध्वज नेहमी फडकत रहावा,अहमदनगर शहरातून जाणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी वधवा यांनी केली. यामध्ये साईनगर-मुंबई फास्ट पॅसेंजर, पुणे-निजामाबाद, मनमाड-दौंड, नांदेड-पुणे या पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे. अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे लाईनचे काम गतीने व्हावे, अशी अपेक्षा यावेळी करण्यात आली.