अळकुटी : पारनेर तालुक्यातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कळस गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चक्क मंदिरात, सभामंडपात, पडवीत, झाडाखाली तर कधी उघड्यावर भरविण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे़ या शाळेच्या दहा वर्गखोल्या मोडकळीस आले आहेत़कळसच्या शाळेत १७१ विद्यार्थी असून, ८ शिक्षक येथे ज्ञानदानाचे काम करीत आहेत़ सध्या ही शाळाच मोडकळीस आली आहे़ त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना मंदिरात, सभामंडपात, पडवीत, झाडाखाली तर कधी उघड्यावर बसून ज्ञानार्जन करावे लागत आहे़ विशेष म्हणजे गावाचा माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते आदर्श पुरस्काराने सन्मान झाला. त्याशिवाय संत गाडगेबाबा पुरस्कार, तंटामुक्ती पुरस्कार, पर्यावरण विकासरत्न पुरस्कार, जिल्ह्यात सलग ३ वर्षे ग्रामस्वच्छता पुरस्कार, जिल्ह्यात हागणदारीमुक्तीत तिसरा व दुसरा पुरस्कार अशा पुरस्कारांनी गावाचा सन्मान करण्यात आला आहे़ परंतु आता याच गावात विद्यार्थ्यांना सुरक्षित शिक्षण घेता येईल, अशी परिस्थिती राहिली नाही़ गावात जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरवस्था होऊन इमारत मोडकळीस आलेली आहे़ शाळेची इमारत कधी कोसळेल याचा भरोसा नाही़ त्यामुळे शिक्षकही या शाळेत विद्यार्थ्यांना बसविण्याचे धाडस करीत नाहीत़ विद्यार्थ्यांना मंदिराच्या पडवीत, सभामंडपात, झाडाखाली, मोकळ्या मैदानात वर्ग भरवून शिक्षक ज्ञानदानाचे काम करीत आहेत. गाव आदर्श झाले़ मात्र शाळेच्या प्रश्नाबाबतच हलगर्जीपणाचा ‘कळस’ का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे़
राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त कळसची शाळा भरते मंदिरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 17:41 IST