लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिलेल्या अश्वासनांची पूर्तता करण्यावर सत्ताधाऱ्यांचा भर असतो. वर्षभरात हे प्रकल्प पूर्ण केले नाही, तर विरोधक टीकेची झोड उठवितात. अहमदनगर महापालिका मात्र त्यास अपवाद आहे. अर्थसंकल्पात मोठ मोठ्या प्रकल्पाची घोषणा होते, परंतु प्रत्यक्षात प्रगती शून्य. पिंपळगाव माळवी प्रकल्प तर चक्क बारा वर्षे उलटूनही अर्थसंकल्पातून बाहेर आला नाही. सभापती अविनाश घुले यांनीही पुन्हा हीच घोषणा केल्याने पिंपळगाव माळवी प्रकल्पाचे पुरते हसे झाले आहे.
महापालिकेची पिंपळगाव माळवी येथे ७०० एकर जमीन आहे. पाण्याचा मोठा तलाव आणि त्याभोवती झाडेझुडपे, डोंगर-दऱ्या असा निसर्गरम्य परिसर अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. महापालिकेची अर्थिक स्थिती बिकट असल्याने उत्पान्नाचा स्रोत म्हणून या जागेचा वापर करावा, यावर सभागृहात अनेक वेळा चर्चांचे फड रंगले. तत्कालीन आयुक्त रमेश पवार, कल्याण केळकर आदींनी या जागेवर प्रकल्प उभारता येईल, असा प्रस्ताव दिला होता, परंतु या जमिनीच्या सातबाऱ्यावर मनपाचे नाव नव्हते, हाही जागा विकसित करण्याचा प्रमुख अडथळा होता. तोही दूर झाला. मनपाचे नाव सातबाऱ्यावर लागले. सातबाऱ्यावर नाव लागल्याने ही जागा विकसित करण्याचा अडथळा दूर झाला होता. नाव लागून आठ वर्षांचा कालावधी उलटून गेला, परंतु या जागेवर नेमका कुठला प्रकल्प करायचा, याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. काही दहा वर्षांतील अर्थसंकल्पाची पाने चाळल्यास त्यामध्ये पिंपळगाव माळवी येथे प्रकल्प विकसित करणे, असा उल्लेख सापडतो. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून प्रकल्प विकसित करण्याचे आश्वासने सत्ताधाऱ्यांकडून दिले गेले. प्रत्यक्षात त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे हा प्रकल्प कागदावरच राहिला आहे. राष्ट्रवादीचे अविनाश घुले हे दुसऱ्यांदा सभापती झाले आहेत. त्यांनी अर्थसंकल्पातून शहर विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहेत. पिंपळगाव माळवी येथे प्रकल्प करण्याची घोषणाही घुले यांनी केली आहे. मागील सभापतींनीही अशीच घोषणा केली होती, परंतु हा प्रकल्प कागदावरच राहिला असून, घुले यांच्याकडून हा प्रकल्प विकसित होईल, अशी नगरकरांना अपेक्षा आहे. पुढील वर्षभरात हा प्रकल्प मार्गी लागताे की, पुन्हा पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात पिंपळगाव माळवी येथे अर्थसंकल्प विकसित करणे आहे, असा उल्लेख येतो, ते येणाऱ्या काळात दिसेल.
.....
अर्थसंकल्पातून प्रकल्प बाहेर येईल का?
अविनाश घुले यांच्या रूपाने सभापती पद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले आहे. शहराचे आमदार संग्राम जगताप हेही राष्ट्रवादीचे आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. आमदार जगताप हे शहरातील विविध प्रकल्पांसाठी सरकारकडे पाठपुरवा करत असतात. ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी त्यांनी सरकारकडे निधीची मागणी केली. तशी मागणी ते पिंपळगाव माळवी येथील प्रकल्पासाठी ही करू शकतात. नगरकरांना त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे यंदा तरी हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरेल का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.