राज्यात लक्षवेधी ठरलेल्या श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत बबनराव पाचपुते विरोधी इतर सर्व अशी लढत रंगली.यात पाचपुते यांचा मोठय़ा फरकाने दणदणीत पराभव झाला. जगताप यांच्या विजयाने तालुक्याच्या राजकारणाला नवीन वळण मिळणार आहे.
विश्लेषण
बिन लग्नाचा आमदार.!
सन १९८0 साली बबनराव पाचपुते यांनी कुंडलिकराव जगताप यांचा पराभव केला. त्यावेळी पाचपुते यांचे लग्न झालेले नव्हते. यंदाच्या निवडणुकीत कुंडलिकराव जगतापांचे चिरंजीव राहुल जगताप यांनी बबनराव पाचपुतेंचा पराभव केला. जगताप यांचेही लग्न झालेले नाही. ३५ वर्षांनी श्रीगोंद्याला बिगर लग्नाचा आमदार लाभला. सरकार विरोधी आमदाराची परंपरा कायम
राज्याचे लक्ष लागलेल्या श्रीगोंदा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रीगोंद्यातील पाचपुते विरोधकांनी वज्रमूठ बांधली. पवारांच्या या राजकीय चक्रव्युहाला छेद देण्यात बबनराव पाचपुते यांना अपयश आले आहे. राष्ट्रवादीच्या राहुल जगतापांच्या विजयाने श्रीगोंदेकरांनी सरकार विरोधी आमदार देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. १९८0 सालापासून बबनराव पाचपुते यांनी वेगवेगळ्या निवडणूक चिन्हावर सहा वेळा आमदारकी खेचून आणत राज्य पातळीवर राजकीय दरारा कायम ठेवला होता. मात्र, राज्यातील बदलत्या सत्ता समीकरण आणि पक्षांतर्गंत होणार्या विरोधामुळे बबनराव पाचपुते यांनी पवार काका पुतण्यांवर वार करीत भाजपात प्रवेश केला. यामुळे चिडलेल्या शरद पवार यांनी काँग्रेसचे शिवाजीराव नागवडे, आमदार अरुण जगताप, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा, घनश्याम शेलार, प्रा.तुकाराम दरेकर या दिग्गज नेत्यांना एकत्र आणले आणि तरूण चेहरा असणारा आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असणार्या राहुल जगताप यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत पवारांनी आपले लक्ष्य साध्य केले. या विधानसभा निवडणुकीत साकळाई, कुकडी व घोडच्या पाणी प्रश्नामुळे मताचे विभाजन झाले. नगरच्या होमपिचवर शिवसेनेचे प्रा.शशिकांत गाडे यांनी आघाडी मारण्याचा प्रयत्न केला. कुकडीच्या पट्टय़ात जगतापांच्या घड्याळाला मतदारांनी जोरात चावी दिली तर अपेक्षेप्रमाणे घोडच्या पट्टय़ातील मतदारांनी पाचपुतेंचे कमळ फुलविण्याचा प्रयत्न केला. तापलेल्या कुकडीच्या पाण्याचा चटका पाचपुतेंना बसला आणि ३५ वर्षानंतर तालुक्यात सत्ता परिवर्तन करण्यात विरोधक यशस्वी झाले. पाचपुते यांचा पराभव करणारे जगताप हे जायंट किलर ठरले आहेत. यापूर्वी सर्वविपरीत राजकीय परिस्थिीत पाचपुते यांनी वेगवेगळ्या पक्षातून आणि चिन्हावर यशस्वीपणे मात केलेली आहे. मात्र, देशात आणि राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असतांना पाचपुते यांचा झालेला पराभव सर्वांच्या जिव्हारी लागणारा ठरणार आहे. सलग तीस वर्षे सत्तेच्या अवतीभवती फिरणार्या पाचपुते यांचा पुढील राजकीय प्रवास खडतर होणार असून यातून ते कशा प्रकारे मार्गक्रमण करणार हे पुढील काळच ठरविणार आहे. दरम्यान जगताप यांच्या विजयाचे तालुक्यात जल्लोषात स्वागत होत आहे. राज्यात लक्षवेधी ठरलेल्या श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत बबनराव पाचपुते विरोधी इतर सर्व अशी लढत रंगली.यात पाचपुते यांचा मोठय़ा फरकाने दणदणीत पराभव झाला. जगताप यांच्या विजयाने तालुक्याच्या राजकारणाला नवीन वळण मिळणार आहे. विश्लेषण बाळासाहेब काकडे