गोंदकर म्हणाले, गेल्या दीड वर्षापासून देवस्थान बंद असल्याने शिर्डीचे अर्थकारण कोलमडले आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. उत्पन्नाचे सगळे मार्ग बंद असल्याने आजारपण, घरखर्च, मुलांचे शिक्षण या बाबी ऐरणीवर आल्या आहेत. शिर्डीत मुख्य व्यवसाय हॉटेलचा आहे. त्यात शिर्डीतील बहुतांश हॉटेल बँकांची कर्ज घेऊन उभी राहिली आहेत. सक्तीची वसुली, जप्ती, लिलाव आदी प्रक्रिया सुरू आहेत. या परिस्थितीत बँकांकडूनही हप्ते वसुलीचा तगादा सुरू आहे. नगरपंचायतचाही कर वसुलीसाठी पाठपुरावा सुरू आहे. या काळात व्यवसाय बंद असतानाही विजेचे सरासरीने हजारो रूपयांची बिले येत आहेत. आजवर शिर्डीतून महावितरणला मोठा व नियमित महसूल मिळत होता. लॉकडाऊनमुळे शिर्डीचे अर्थकारण कोलमडल्याने शिर्डीची बिकट अवस्था झाली आहे. व्यवसाय सुरू झाल्यावर शिर्डीकर बिले भरणारच आहेत, ती चुकणार नाही पण, सध्या मानवतेच्या भूमिकेतून थेट वीज कनेक्शन तोडण्याची भूमिका न घेता टप्प्याटप्प्याने पैसे भरण्याची सवलत द्यायला हवी.
...............
जगावे कसे याची भ्रांत
सध्या एखाद्या फायनान्स कंपनीप्रमाणे महावितरण वीज कट करण्याच्या धमक्या देऊन जबरी वसुली करत आहे. महावितरणने जबरदस्तीने वसुली करणाऱ्या यंत्रणांनी आपली भूमिका बदलली नाही तर, लोकांवर आंदोलनाची नाही तर आत्महत्येची वेळ येईल, असा इशारा गोंदकर यांनी दिला.