शहरातील साथी भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठान येथे नुकतेच पुराेगामी संस्था, संघटनांच्या समन्वय मंचची बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रसेवा दलाचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक, समाजवादी जनपरिषदेच्या नेत्या ॲड.निशा शिवूरकर, ॲड.ज्योती मालपाणी, ॲड.प्रदीप मालपाणी, ॲड.नईम इनामदार, किशोर चव्हाण, अब्दुला चौधरी, शाहनवाज बेगमपूरे, ॲड.गोपीनाथ घुले आदी यावेळी उपस्थित होते.
शहरातून जाणारा जुना नाशिक-पुणे महामार्ग सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली रस्ता रुंदीकरणाचा घाट घालण्यात आला आहे. लोकांच्या बांधकामांना बाधित करण्याचा सार्वजनिक बांधकाम खात्याचा मनसुबा दिसतो आहे. रुंदीकरणात घरे, दुकानांवर खुणा केल्या असल्याने, आधीच कोरोनाच्या भीतीत जगत असलेले नागरिक आता काळजीत पडले आहेत. वहिवाटीनुसार स्वमालकीच्या जागेवर पक्के बांधकाम केलेल्या नागरिकांवर अन्याय होणार असून, अनेक कुटुंबे उघड्यावर येणार आहेत. व्यावसायिक, नागरिकांच्या अडचणी, समस्या यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. त्या संदर्भाने जाणीव, जागृती करत नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यात येणार आहेत. प्रत्येक व्यक्तीची नेमकी समस्या काय आहे. कोणत्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याने रुंदीकरणाच्या खुणा केलेल्या आहेत. त्या सगळ्या बाबींवर एकत्रितपणे सगळ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पुढील नियोजन करण्यात येणार आहे, असेही अवसक यांनी सांगितले.