अहमदनगर : अहमदनगर शहरासह श्रीरामपूर, अकोले आणि कोपरगाव तालुक्यातील रुग्ण संख्या घटली आहे. या तिन्ही ठिकाणी रविवारी २० च्या आत पॉझिटिव्ह आढळून आले. श्रीगोंदा, पारनेर, पाथर्डी, नेवासा, शेवगाव या तालुक्यात मात्र रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण कायम आहे.
जिल्ह्यात रविवारी ४१४ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७३ हजार ४०२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०५ टक्के इतके झाले आहे. रुग्ण संख्येत ४९१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २ हजार ३८१ इतकी आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १७, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २४५ आणि अँटिजेन चाचणीत २२९ रुग्ण बाधित आढळले.
रविवारी आढळून आलेल्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये श्रीगोंदा (७१) पारनेर (५८) पाथर्डी (४७) नेवासा (४०) शेवगाव (३८) राहुरी (३७) नगर ग्रामीण (३२), राहाता (३०) जामखेड (२६), संगमनेर (२४) कर्जत (२३) नगर शहर (१६) अकोले (१३) कोपरगाव (१२) इतर जिल्हा (६) भिंगार (२) येथील रुग्णांचा समावेश आहे.
-------------
लग्नासाठी गर्दी
पहिली लाट ओसरल्यानंतर लग्नकार्ये धुमधडाक्यात झाली आणि पुन्हा दुसरी लाट आली. त्यासाठी लग्नसोहळेच कारणीभूत ठरली. आताही दुसरी लाट ओसरल्यानंतर लग्नसोहळ्यांना मोठी गर्दी होत आहे. ५० जणांच्याच उपस्थितीत लग्नसोहळा करा, असा प्रशासनाचा नियम असताना आयोजक मात्र सोशल मीडियावर निमंत्रण पाठवित असून वधु-वरांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी होत आहे. एकाच वेळी ५०० ते १००० लोक एकत्र येत असून विशेष म्हणजे ते तोंडाला मास्क लावत नसल्याचे दिसत आहे. यामुळे मंगल कार्यालय चालकही चांगलेच धास्तावले आहेत.
--------
बरे झालेली रुग्ण संख्या : २,७३,४०२
उपचार सुरू असलेले रुग्ण : २,३८१
पोर्टलवरील मृत्यू नोंद : ५,९२७
एकूण रुग्ण संख्या : २,८१,७१०