अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सोमवारी ३२५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही वाढली आहे. सोमवारी जिल्ह्यात १७४० रुग्ण सक्रिय असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनही चिंतेत आहे.
जिल्ह्यात सोमवारी २१९ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७५ हजार २२७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२९ टक्के इतके झाले आहे. सोमवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १४९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १७३ आणि अँटिजन चाचणीत ३ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये नगर शहर (९१), अकोले (६), जामखेड (२), कर्जत (२), कोपरगाव (४), नगर ग्रामीण (२०), नेवासा (१२), पारनेर (१३), राहाता (२१), राहुरी (१८), संगमनेर (७०), शेवगाव (३३), श्रीरामपूर (१), कॅन्टोन्मेंट (४), पाथर्डी (५), श्रीगोंदा (२), श्रीरामपूर (११), इतर जिल्हा (८) येथील रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, सोमवारी एकाच दिवसात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हे तिन्ही मृत्यू जिल्ह्यातील आहेत. सर्वाधिक रुग्ण नगर शहर आणि संगमनेरमध्ये वाढत आहेत. शेवगाव तालुक्यातही रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.
-----------
एकूण रुग्णसंख्या : ७८१२४
बरे झालेली रुग्णसंख्या : ७५२२७
उपचार सुरू असलेले रुग्ण : १७४०
मृत्यू : ११५७
-----------