अहमदनगर : लष्करातील कामे निविदांद्वारे घेण्यासाठी एका फर्मची स्थापना करून त्यासाठी नऊ लाख रुपयांचे भांडवल घेतले. मात्र कामही नाही आणि परतावाही मिळाला नसल्याने कोतवाली पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सागर सुभाष राठी (रा. नटराज हॉटेलच्या मागे, औरंगाबाद रोड) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, गंजबाजारात त्यांचे मोबाईल केअर अॅण्ड स्पेअर हे दुकान आहे. या दुकानात पुणे येथील दोघेजण आले. त्यांनी लष्करामध्ये अनेक कामे केली जातात. निविदांद्वारे ही कामे मिळवून देता येतील. मात्र त्यासाठी भांडवल नाही. त्यामुळे राठी यांच्याकडून मोईन तय्यब अलोदिन आणि ताहीर मोईदिन (रा. औरंगाबाद रोड) यांनी जुलै-२००९ पासून अनेक टप्प्यांमध्ये पैसे घेतले. त्यासाठी ‘फिस्को’नावाची कंपनी स्थापन करून त्यामध्ये राठी यांना भागीदार करून घेण्यात आले. आतापर्यंत त्या दोघांनी राठी यांच्याकडून नऊ लाख रुपये घेतले आहेत. मात्र कोणते कामही नाही आणि पैसेही परत न मिळाल्याने राठी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजने, कॉन्स्टेबल मंगेश खरमाळे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
नऊ लाखांची फसवणूक
By admin | Updated: June 9, 2014 00:03 IST