अहमदनगर : जिल्हा परिषदेचा महिला बालकल्याण विभाग व आरोग्य विभागाने केलेल्या सांघिक कामगिरीमुळे जिल्ह्याचा स्त्री जन्मदर ९१८ वर पोहचला आहे. उल्लेखनीय म्हणजे नेवासा तालुक्यात हा जन्मदर ९८० वर पोहचला असून अकोले सारख्या मागास आदिवासी तालुक्यात स्त्री जन्मदर हा ९६५ पर्यंत पोहचला असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली. असे असतांना पाच तालुक्यात हा दर ९०० च्या खाली असून यात श्रीरामपूर तालुक्यात सर्वात कमी ८४६ आहे. अहमदनगर जिल्हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो. मात्र, याच जिल्ह्यात २००९ पर्यंत स्त्री पुरूष जन्म दरात स्त्री जन्मदराचे प्रमाण ८२८ पर्यंत होते. त्यावेळी स्त्री जन्मदर वाढविण्यासाठी महिला बालकल्याण विभागाने विविध उपाययोजना आखण्यास सुरूवात केली. तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पावडे यांनी आरोग्य विभागाची साथ घेत नावीन्यपूर्ण योजना आखण्यास सुरूवात केली.सुकन्या योजना सुरू होण्यापूर्वी नगर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या मदतीने जन्माला येणाऱ्या मुलींच्या नावावर ५ ते १० हजार रुपयांची मुदत ठेव पावती करण्यास सुरूवात केली. जिल्ह्यात सध्या ७४२ ग्रामपंचायतीत ही योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाकडून ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या दहा टक्के सेस फंडातून यासाठी तरतूद करण्यास सांगण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी अंगणवाडीतील मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. यात बालवाडीत येणाऱ्या मुलांना केवळ आहार न देता, त्यांना प्राथमिक ज्ञान देण्यात येत आहे. यासाठी पुस्तिका तयार करण्यात आली असून त्यानुसार कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ५ हजार ३२२ अंगणवाडी सेविका, ५ हजार मदतनीस आणि ३ हजार आशा सेविकांच्या मदतीने हा कार्यक्रम राबविला जात आहे. (प्रतिनिधी)
नेवाशाचा स्त्री जन्मदर ९८०
By admin | Updated: October 7, 2014 23:42 IST