कोपरगाव : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गास समांतर असलेली प्रस्तावित ‘मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन’च्या कामामुळे कोपरगाव परिसरातील एकाही शेतकऱ्याची सामाजिक व पर्यावरणीय हानी होणार नाही. या प्रकल्पामध्ये पर्यावरण, जैव विविधता, ग्रामसभेच्या माध्यमातून स्थानिक लोकांच्या भावना व गरजांचा संवेदनशीलपणे विचार करण्यात आला आहे, अशी माहिती कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.
नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन’ समृद्धी महामार्गाला समांतर उभारण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. त्या संदर्भातील रेल्वे प्रकल्पाच्या पर्यावरण व सामाजिक विचारांसाठी सार्वजनिक सल्ला बैठक शुक्रवारी (दि.१७) कोपरगाव तहसील कार्यालयात पार पडली. या बैठकीला कोपरगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचआरसीएल) चे पथक प्रमुख राहुल रंजन, सहायक समाज विकास अधिकारी श्याम चौगुले, पर्यावरण मूल्यांकन अभ्यासक प्राजक्ता कुलकर्णी, प्रदीप बर्गे अधिकारी उपस्थित होते. बुलेट ट्रेनसंदर्भात चित्रफितीद्वारे संभाव्य नियोजनासंदर्भात माहिती देण्यात आली. या सभेला कोपरगाव तालुक्यातील धोत्रे, भोजडे, कान्हेगाव, संवत्सर, कोकमठाण, जेऊर कुंभारी, डाऊच खुर्द, चांदेकसारे, पोहेगाव खुर्द, घारी, देडे कुऱ्हाळे या ११ गावांचे सरपंच उपस्थित होते. सूत्रसंचालन समन्वयक सुशांत घोडके यांनी केले.
.............
असा आहे ‘मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन’ प्रकल्प
केंद्राच्या नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनतर्फे देशातील मेट्रो शहरांना बुलेट ट्रेनने जोडण्यात येणाऱ्या प्रस्तावित ८ बुलेट ट्रेन कॉरिडॉर प्रकल्पात ‘नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन’चा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, अमरावती, वर्धा व नागपूर या ११ जिल्ह्यांतून ही बुलेट ट्रेन धावणार आहे. समृद्धी महामार्गाला समांतर असा हा बुलेट ट्रेन मार्ग आहे. मुंबई-नागपूरदरम्यान ७३९ किलोमीटरचा हायस्पीड कॉरिडॉर आहे. यामुळे मुंबई-नागपूर अंतर अवघ्या साडेतीन तासांत कापले जाणार आहे. यात ११ जिल्ह्यांतील १२४५.६१ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. यात कोपरगाव तालुक्यातील ११ गावांची ५१.५० हेक्टर जमीन संपादित होणार आहे.
170921\img-20210917-wa0055.jpg
फोटो१७- शेतकरी बैठक - कोपरगाव