इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात बुधवारी काँग्रेसच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. आमदार लहू कानडे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपुरात सायकल रॅली काढण्यात आली. त्याप्रसंगी कानडे यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
कानडे म्हणाले, सर्व देशावर कोरोनाचे मोठे संकट असताना केंद्र सरकारकडून जनतेला पुरेसा औषध पुरवठा झाला नाही. पुरेसे ऑक्सिजन मिळाले नाही. गॅसच्या किमती वाढवल्या. इंधनावरील कर वाढवून सर्वसामान्यांची लूट केली. इंधन दरवाढ झाल्याने वाहतुकीची सर्व साधने महागली. वाहतुकीचे दर वाढले. त्याचा परिणाम इतर व्यवसायावर ही झाला. अन्नधान्य व घरगुती गॅस महागला. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर निच्चांकी पातळीवर असताना पेट्रोल, डिझेलवर १८ रुपये रस्ते विकास सेस व ४ रुपये कृषी सेसच्या माध्यमातून पैसे घेतले जात आहेत. पेट्रोल, डिझेलवरील कर मधून मागील ७ वर्षात केंद्र सरकारने २२ लाख कोटींचे उत्पन्न कमावले. परंतु त्याचा विकासासाठी उपयोग केला नाही. कर शिवाय पेट्रोलची किंमत ३२ रुपये आणि डिझेल ३३ रुपये लिटर आहे. भरमसाठ कर लावल्याने मोदी सरकारच्या काळात पेट्रोलचे दर भडकले.
आंदोलनात उपनगराध्यक्ष करण ससाणे, इंद्रभान थोरात, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, माजी नगराध्यक्ष संजय फंड, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, शहराध्यक्ष संजय छल्लारे, ज्ञानेश्वर मुरकुटे, नगरसेवक मुजफ्फर शेख, दिलीप नागरे, शशांक रासकर, बाबासाहेब दिघे, राजेंद्र पाऊलबुधे, रमेश कोठारी, सतीष बोर्डे, अशोक पवार, सुधीर नवले, अभिजीत लिप्टे, सुभाष तोरणे, रितेश रोटे, विजय बोर्डे उपस्थित होते.