श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन पोलीस बंदोबस्तात सुटले. मात्र, शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यापूर्वीच आवर्तन बंद झाले. त्यामुळे कुकडीचे आवर्तन शेतकऱ्यांना ‘मृगजळ’ ठरले आहे. कुकडीचे आवर्तन १७ एप्रिल रोजी पोलीस बंदोबस्तात सोडण्यात आले. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी कुकडी कालव्यावर जमावबंदी आदेश लागू केला. त्यामुळे शेतकरी कालव्याकडे फिरकले नाहीत. काही प्रतिष्ठितांनी प्रशासनावर दबाव आणून इच्छापूर्ती केली. मात्र, सामान्य शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. कर्जत तालुक्यात दोन वेळा कालवा फुटल्याने श्रीगोंद्यातील भावडी, मोहरवाडी, विसापूर या तलावांना झुकते माप मिळाले. जिल्हाधिकारी कार्यालयाने श्रीगोंद्यातील अवघ्या सात तलावात पाणी सोडण्याचा फतवा काढल्याने सर्वांची कोंडी झाली. आमदार राहुल जगताप, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पिण्याचे पाणी सोडण्यासाठी तलावांच्या जम्बो याद्या दिल्या. जिल्हाधिकारी कवडे यांनी सर्व याद्या फाईल करून ठेवल्या. यामुळे लिंपणगाव, बाबुर्डी, शिरसगाव बोडखा, चिंभळे, येळपणे, मढेवडगाव, लोणीव्यंकनाथ, म्हातारपिंप्री या गावांची निराशा झाली आहे. या गावांच्या परिसरात गेल्या वर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे पाणी टंचाईचे भूत प्रत्येक कुटुंबाच्या मानगुटीवर बसले आहे. (तालुका प्रतिनिधी)
कुकडीचे आवर्तन ठरले मृगजळ !
By admin | Updated: May 6, 2016 23:24 IST