अहमदनगर : भिंगार परिसरातील धनदांडग्यांना पैसे घेऊन दोन मजले बांधण्याची परवानगी मिळत असल्याचा आरोप करत छावणी मंडळाच्या जाचक अटी व नियमांमुळे सामान्यांवर स्थलांतर होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी खंत भिंगार येथील संतप्त महिलांनी शुक्रवारी व्यक्त केली़भिंगार येथील सरपण गल्लीत ‘लोकमत’ च्या वतीने अभियान राबविण्यात आले़ यावेळी महिलांनी अरुंद गल्लीबोळा, उघड्या गटारी व घाणीने माखलेले रस्ते, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून अनियमित, कमी दाबाने सुरू असल्याची तक्रार महिलांनी यावेळी केली़ महिलांनी छावणी परिषदेच्या कारभारावर असंतोष व्यक्त करत अधिकारी ऐकणार नसतील तर महिला रस्त्यावर उतरतील, असा इशाराही यावेळी महिलांनी दिला़ ऐतिहासिक शहराचे स्वच्छ व सुंदर शहर कधी होणार, असा सवाल उपस्थित करताना, दुय्यम अधिकारी वर्गाकडून त्रास दिला जातो़ धनाड्य मंडळींच्या दुमजली इमारतींना पैसे घेऊन परवानगी दिली जाते तर आमच्यासारख्या सामान्य लोकांनी घरावर दोन पत्रे टाकले असता इंग्रजीमधे नोटीस पाठवली जाते. आमच्या घरात दोन पाहुणे आले तर अपुऱ्या जागेअभावी मुक्कामाला थांबा, असे म्हणता येत नाही. चटईसारख्या क्लिष्ट प्रश्नामुळे नागरिकांनी स्थलांतर केले आहे तर अन्य नागरिक आहे त्या मोडकळीला आलेल्या घरात जीव मुठीत घेऊन राहत असल्याची खंत महिलांनी बोलून दाखवली. उघड्या गटारीमुळे रोगराई पसरत आहे. गटारीतील गाळ काढल्यास तो तीन महिने उचलला जात नाही़ स्वच्छता कर्मचारी सफाईसाठी येत नाहीत. सार्वजनिक स्वच्छता गृह सफाईसाठी ठेकेदाराकडे ठेका दिलेला आहे, त्याची स्वच्छता नियमित होत नसल्याचे सांगितले़ रोकडोबा मंदिराच्या सुशोभिकरणासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत़ तसेच ऐतिहासिक भिंगार टेकडीचे सुशोभिकरण करून लहान मुलांसाठी उद्यान उभारावे. ज्या भागात पाणी पुरवठा होत नाही, त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा, विधवा महिलांना व त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी विविध योजना राबवण्यात यावी, अशी मागणी महिलांनी यावेळी केली़ आजचा मुक्कामकंजारवाडास. ९.०० वा. भिंगार
जाचक अटींमुळे स्थलांतराची वेळ
By admin | Updated: June 3, 2016 23:24 IST