अहमदनगर : येथील रेल्वे मालधक्का इतरत्र स्थलांतरित करण्याचा डाव प्रशासनाकडून आखला जात असून, हे कदापि होणार नाही. स्थानिक अधिकारी चुकीची माहिती देऊन वरिष्ठांची दिशाभूल करत आहेत. अधिकाऱ्यांनी चुकीचे केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला.
आमदार जगताप यांनी रेल्वे स्टेशन येथील मालधक्क्यावर उपस्थित कामगारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बाेलत होते. यावेळी हमाल पंचायतचे अध्यक्ष तथा मनपा स्थायी समिती सभापती अविनाश घुले, नगरसेवक प्रशांत गायकवाड, माणिक विधाते, सुमतीलाल कोठारी यांच्यासह माथाडी कामगार उपस्थित होते. आमदार जगताप म्हणाले, माथाडी कामगारांचे नेते अविनाश घुले यांनी माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी वारंवार आंदोलने केली. प्रशासनाला निवेदने दिली. परंतु, कृषी अधिकाऱ्यांनी वाहतूकदारांशी संगनमत करून रेल्वे मालधक्का इतरत्र स्थलांतरित करण्याचा डाव आखला आहे. हा मालधक्का स्थलांतरित झाल्यास ६०० माथाडी नोंदणीकृत कामगारांवर उपासमारीची वेळ येईल. त्यास जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
माथाडी कामगारांनी कोरोनाच्या परिस्थितीत आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. त्यामुळे सर्वांना अन्नधान्य, खते, सिमेंट उपलब्ध झाले. कृषी विकास अधिकाऱ्याला मालधक्का का बंद ठेवायचा आहे, कशामुळे हालवायचा आहे, त्याचे कारण स्पष्ट होत नाही. तसेच हमाल कामगार व सहायक कामगार आयुक्त यांना ही ते दाद देत नाही. ट्रान्सपोर्ट कंपनीच्या व वाहतूकदार संघटनेच्या सोयीसाठी ही भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे, असे जगताप म्हणाले.
....
सूचना : फोटो १२ रेल्वे नावाने आहे.