अहमदनगर: नागापूर औद्योगिक वसाहतीतील इंडियन सिमलेस कंपनी पूर्ववत होण्याची चिन्हे नाहीत़ कंपनी व्यवस्थापन व कामगार यांच्यात गुरुवारी झालेली चर्चा फिस्कटली असून, याविषयी पुन्हा शुक्रवारी सकाळी बैठक घेण्यात येणार असल्याचे कामगार कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे़ या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे़कामगार व कंपनी व्यवस्थापनात वाद उफाळून आला़ कंपनी व्यवस्थापनाने काल बुधवारी उत्पादन बंद करण्याचा निर्णय जाहीर करून कामगारांना घरी पाठविले आहे़ तर कामगारांनी कंपनीच्या विरोधात दंड थोपटले आहेत़ परस्परविरोधी तक्रारी कामगार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत़ प्राप्त तक्रारींवरून कामगार आयुक्त कार्यालयात सकाळी संघटना व व्यवस्थापनाचे प्रतिनिधींत बैठक झाली़ मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही़ त्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली असून, याविषयी पुन्हा शुक्रवारी बैठक घेण्याचे ठरले आहे़इंडियन सिमलेस कंपनीतील कामगारांना गेल्या पंधरा महिन्यांपासून पगारवाढ देण्यात आली नाही़ कंपनीत स्वच्छता ठेवली जात नाही, काही कामगारांना विनाकारण कामावरून कमी करण्यात आले़ त्यामुळे कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठीचा लढा उभारण्यासाठी कंपनीच्या आवारात बैठक घेण्यात आली़ मात्र ही बैठक घेतल्याच्या कारणावरून कंपनीने उत्पादन बंद करून कामगारांना पोलीस बंदोबस्तात बाहेर काढले, असे कामगारांचे म्हणणे आहे़ तर कामगारांच्या दादागिरीमुळे उत्पादन बंद करण्याची वेळ आली आहे, असे कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले़ बेकायदेशीररित्या कामाच्या वेळेत बैठक घेऊन कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी कंपनीत घोषणाबाजी केली़ कंत्राटी कामगारांना दमदाटी करून काम बंद करण्यास भाग पाडले़ त्यामुळे कंपनीत भितीचे वातावरण पसरल्याने कंपनी बंद करण्यात आली़ अशा परिस्थितीत कंपनी पुन्हा सुरू करणे शक्य नसल्याचेही सांगण्यात आले आहे़त्यामुळे कंपनी पुन्हा सुरू होणार की नाही, याबाबत साशंकता आहे़कामगारांच्या मागण्यांबाबत वरिष्ठस्तरावर चर्चा सुरू आहे़ परंतु कामगारांनी ज्या पध्दतीने कंपनीत घुसून दमदाटी केली़ त्यामुळे उत्पादन बंद करण्यात आले़ याविषयी शुक्रवारी बैठक होणार असून, या बैठकीत निर्णय होईल़-दिनेश देव, प्रतिनिधी, कंपनी व्यवस्थापन.कामगारांच्या मागण्यांसाठी बैठक घेतली़ त्यासाठी परवानगी घेतली होती़ बैठकीनंतर घोषणाबाजी करण्यात आली़ मात्र कामगारांनी कुणालाही दमदाटी केली नाही़ उलट व्यवस्थापनानेच कामगारांना बाहेर काढले असून, कंपनीच्याविरोधात न्यायालयात धाव घेणार आहे़ कामगारांना घरी बसून कंपनीला पगार द्यावा लागेल़-बाबूशेठ टायरवाले,नगर जिल्हा मजदूर सेनासकाळी बैठक घेण्यात आली़ या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही़ त्यामुळे सायंकाळी सात वाजता बैठक होणार होती़ परंतु ही बैठक पुढे ढकलली असून, पुन्हा शुक्रवारी घेतली जाणार आहे़-बाळासाहेब वाघ, सहाय्यक आयुक्त, कामगार कार्यालय.
कामगारांचा जीव टांगणीला
By admin | Updated: June 13, 2014 01:15 IST