अहमदनगर : जिल्ह्यात सर्वच तालुक्यात शुक्रवारी रात्रभर आवकाळी पावसाने तडाखा दिला. यात ३२ मि.मी.च्या सरासरीने ४४८ मि.मी पावसाची नोंंद झाली असून तीन लाख हेक्टरवरील ज्वारीला जीवदान मिळाले आहे. काढणीला आलेल्या कांदा आणि कपाशीचे या पावसाने नुकसान झाले आहे. या पावसामुळे काही ठिकाणी पाणी टंचाईला दिलासा मिळणार असून चारा पिकांचे उत्पादन वाढणार असल्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. शनिवार सायंकाळपासून नगर शहरासह चौदाही तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारी रात्रभर पाऊस सुरू होता. हा पाऊस शनिवारी दुपारपर्यंत अनेक भागात पडत होता. गेल्या काही वर्षापासून नोव्हेंंबर महिन्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसत असून त्याची परंपरा यंदाही कायम राहिली. परतीच्या पावसाने दगा दिल्याने रब्बी हंगामाचे चित्र विदारक बनले होते. जिल्ह्यात रब्बीसाठी ७ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र असताना जिल्ह्यात सव्वातीन लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या. यात सर्वाधिक ज्वारीचे क्षेत्र २ लाख ९६ हजार हेक्टर होते. मात्र, परतीच्या पावसाअभावी ज्वारीचे पीक करपत होते. शुक्रवारच्या बेमोसमी पावसाने या ज्वारीला जीवदान मिळाले आहे. या पावसाने गहू आणि हरभरा पिकांचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात गव्हाचे १ लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्र असून त्यातून अवघे अडीच हजार हेक्टर गहू, तर हरभऱ्याचे ९८ हजार क्षेत्र असताना १६ हजार हेक्टरवर त्याची पेरणी झालेली होती. कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, राहाता या तालुक्यात कांदा आणि कपाशीचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)
ज्वारीला जीवदान; कांदा, फळबागांचे नुकसान
By admin | Updated: November 15, 2014 23:39 IST