श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील उपकेंद्र तसेच श्रीगोंदा तालुक्यातील सहा व नगर तालुक्यातील एक अशा सात उपकेंद्रांना माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी मंजुरी आणली. तालुक्यातील सहा उपकेंद्रांची कामे गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहेत. त्यामुळे आमदार राहुल जगताप यांची पत्रकबाजी म्हणजे आयत्या पिठावर रेषा मारल्याचा प्रकार आहे, अशी टीका श्रीगोंदाच्या नगराध्यक्षा सुनीता शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना केली. त्या म्हणाल्या, बबनराव पाचपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे पाठपुरावा करुन श्रीगोंदा शहरातील विविध योजना मंजूर करून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. या निधीमधूनच शहरातील रस्ते, भूमिगत गटार, पथदिवे, श्रीगोंदा शहराची कायमस्वरुपी पाणी टंचाई दूर होण्यासाठी सुमारे ४९ कोटी रुपये खर्चाची घोड नळ पाणी योजना, श्रीगोंदा शहरातील वाढती वीज मागणी विचारात घेऊन आणि शहरातील भारनियमन बंद करण्यासाठी स्वतंत्र उप वीज केंद्र सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. तालुक्यातील लिंपणगाव, पेडगाव, निमगाव खलू, येळपणे, भानगाव, पिंपळगाव पिसा व नगर तालुक्यातील गुंडेगाव या सात उपकेंद्रांना आघाडी सरकार असताना पाचपुते यांनी मंजुरी दिली. तसेच अनेक वीज उपकेंद्राची भूमिपूजनेही झाली होती. त्यावेळी राहुल जगताप आमदार नव्हते. श्रीगोंदा शहर व तालुक्यातील वीज, रस्ते, पाणी या विकास योजना पाचपुते यांनी राबविल्या. मात्र स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी जगताप व त्यांचे समर्थक सोशल मीडियातून केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. आ.जगताप श्रीगोंदा शहरातील विकासात्मक कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. शहराच्या विकासासाठी आतापर्यंत त्यांनी किती निधी आणला? नगरपालिकेच्या निर्णयाची वाट न पहाता लोकप्रतिनिधी म्हणून आ.जगताप यांनी किती टँकरने शहराला पाणी पुरवठा केला हे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हानही नगराध्यक्ष शिंदे यांनी दिले आहे.
जगताप यांच्या आयत्या पिठावर रेघोट्या
By admin | Updated: June 24, 2016 01:19 IST